घाटनांदूर (जि. बीड) - भतनवाडी (ता. अंबाजोगाई) येथे दोन दिवसांपासून गेलेली वीज मध्यरात्री अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटर ठेवलेल्या भांड्यातील पाणी उकळून बाहेर आले. यानंतर भांडे कलंडून उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळी सुटीनिमित्त आजोळी आलेल्या दोन मुलींसह मामाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मामीही गंभीर भाजली आहे. दुर्गा बिभीषण घुगे (वय 10, रा. सोनपेठ, जि. परभणी), धनश्री पिंटू केदार (वय 8, रा. व्हट्टी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि अदिती शंभूदेव भताने (वय 4) अशी मृत बालिकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त भतानवाडी येथील त्यांचे मामा शंभूदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. रात्री दुर्गा, धनश्री, अदिती आणि शंभूदेव यांच्या पत्नी संगीता (वय 24) या घरात झोपल्या होत्या. इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसांपासून वीज नसल्याने सकाळी सुरू केलेल्या हिटरचे बटन तसेच चालू अवस्थेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हा हिटर सुरू झाला. भांड्यातील पाणी उकळून बाहेर आले. हिटर ठेवलेल्या भांड्याच्या स्टूलखालील सिमेंटचे गट्टू खचले आणि भांडे कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामीच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या घटनेत चौघीही गंभीर भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अदितीचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. 11) दुर्गाचा आणि बुधवारी (ता. 12) धनश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मामी संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अदिती, दुर्गा आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. |