मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठिकाणी रस्त्याच्या कडेला मुंबईकरांनी आपली वाहने पार्क केली होती. अशा वाहनांवर बृहन्मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांत महापालिकेने 243 वाहनांवर कारवाई केली असून सुमारे साडे आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली असताना या कारवाईला मुंबईकरांनी विरोध दर्शविला आहे. काल (ता.9) 53 चारचाकी, 3 तीनचाकी आणि 51 दुचाकी अशा एकूण 107 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 5 लाख 19 हजार 460 रुपये दंड जमा करण्यात आला आहे. ही रक्कम विभागातील विकास कामांसाठी खर्च केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी काही निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील 27 वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर रविवारपासून (ता.७) दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनधिकृत पार्किंग विरोधात गेल्या 3 दिवसांमध्ये 243 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामधून 8 लाख 69 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई केलेल्या 243 वाहनांमध्ये 133 चारचाकी, 9 तीनचाकी व 101 दोन चाकी वाहनांचा समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.