मुंबई - केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विविध क्षेत्रांत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी देखील वेगाने सुरू आहे. केंद्र सरकार करीत असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोचवा, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. अमित शाह यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास नमन केले व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास भेट दिली. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याच्या प्रभारी सरोज पांडे आदी उपस्थित होते. बैठकीला पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, मोर्चे व आघाड्यांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर उपस्थित होते. शहा यांनी गरवारे क्लब येथे भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "भाजपने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळविल्यानंतर आपण पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी देशव्यापी दौरा सुरू केला आहे. निवडणुका जिंकण्यासोबतच समाज परिवर्तनासाठी भाजप संघटनेचा विस्तार करायचा आहे व ती मजबूत करायची आहे'. "आपला महाराष्ट्राचा तीन दिवसांचा दौरा केवळ संघटनात्मक कार्यासाठी आहे. सदस्य संख्येच्या दृष्टीने भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. भाजप केंद्रामध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेवर आहे तसेच देशाच्या विविध राज्यांत भाजपची सत्ता आहे. विविध निवडणुकात भाजपला मोठे यश मिळाले आहे. देशाच्या प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक समाज घटकामध्ये भाजपचा जनाधार मजबूत करून समाज परिवर्तनासाठी संघटनेला विकसित करायचे आहे,'' असेही ते म्हणाले. |