मुंबई : पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो. जसजसा मृत्यू जवळ येतो, तशी मृत्यूबाबत भीती वाटायला लागते. त्यामुळे मृत्यूबाबत अनेकजण बोलणे टाळतात. विशेषतः दुर्धर आजारामुळे जे रुग्ण मृत्यूशय्येवर आहेत, ज्यांना आजारपणातून बरे होणे अशक्य आहे, अशा रुग्णांना मृत्यूविषयी भीती वाटू नये किंवा आयुष्याचे उरलेले दिवस आनंदात जावेत, यासाठी जॉन अंडरवुड्स यांच्या "मृत्यूचा कॅफे' या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन मुंबईतील दोन महिला मानसोपचारतज्ज्ञांनी समुपदेशन सुरू केले आहे.
आजारपणामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या आहे ते आयुष्य सुखकर व्हावे म्हणून त्यांची काळजी घेतली जाते, त्याला पॅलिएटिव्ह केअर (परिहार सेवा) असे म्हणतात. या सेवेची गरज असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यू, आयुष्यातील शेवट दिवस आदींबाबत भीतीची भावना असते. त्यातूनच मुंबईतील देवौशी मेहता (वय 36) आणि झेना यार्दे (वय 30) या दोन मानसोपचारतज्ज्ञांनी रुग्णांमधील मृत्यूबाबतची भीती आणि चिंता दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी व त्यांचे समुपदेशन करण्यासाठी "मृत्यूवर बोलू काही' (टॉकिंग डेथ) हे चर्चासत्र घेतले. या सत्राला गृहिणी, विद्यार्थी आणि समुपदेशक डॉक्टरांनी हजेरी लावली.
"मृत्यू म्हणजे सर्वांच्या आयुष्याचा शेवट असतो; परंतु मृत्यूबाबत बोलणे म्हणजे अभद्र व वाईट असते, अशा गैरसमजामुळे अनेकजण मृत्यूवर बोलण्यास टाळतो. आपल्यापैकी अनेकांची सामाजिक परिस्थिती मृत्यूबाबत चर्चा करण्यास धजावत नाही, असे चर्चासत्राला उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. तसेच एका डॉक्टरांनी असेही म्हणाले की, "माझा पेशाच असा आहे की, मला अनेकांच्या मृत्यूचा साक्षीदार व्हावं लागतं. त्यामुळे मला या सत्राला उपस्थित राहावंसं वाटलं. परंतु मी माझ्या बायकोला सांगू शकलो नाही की मी या सत्राला आलोय म्हणून. यावरून असे लक्षात येते की, मृत्यूवर बोलण्यास आपल्यावर किती सामाजिक दबाव असतो.'
या सत्राला उपस्थित असलेल्या एका 38 वर्षीय गृहिणीला आईच्या वृद्धापकाळामुळे तिच्या मृत्यूची भीती वाटत होती. तिच्या नवऱ्याच्या म्हणायचा की मृत्यू हा मृत्यू असतो. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. परंतु तिच्यासाठी ही बाब वेगळी आहे. कारण तिच्या वडिलांचे तिच्या वयाच्या 21व्या वर्षीच निधन झाले होते. त्यामुळे आईचाही मृत्यू झाल्यास ती तिचे पालकत्वच गमावून बसेल आणि ती तसा विचारही करू शकत नाही आणि त्यावर कोणाशी चर्चा करू शकत नाही. त्यामुळे ती या सत्राला आली होती. अशा अनेकांनी मृत्यूविषयी आपली मते या चर्चासत्रात मांडली.
----
"मृत्यूवर बोलू काही' या चर्चासत्राचा उद्देश म्हणजे, मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांचे आहे ते आयुष्य सुखकर करण्यासाठी समाजात जनजागृती व्हायला हवी, त्या रुग्णांना मदत करायला हवी. त्यासाठी त्यांच्यातील मृत्यूबाबतची भीती आणि चिंता काढून त्यांना मोकळेपणाने जगण्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अशा समुपदेशन सत्रांची गरज आहे.- देवौशी मेहता, आयोजक.
----
मृत्यूविषयी विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची कल्पना आपण सहसा करत नाही. त्यामुळे आपल्या मनात त्याची भीती असते. मात्र तसे न करता आपण मोठ्या धैर्याने मृत्यूबाबत चर्चा करायला पाहिजे. काही तज्ज्ञांच्या मते, पाश्चिमात्य देशांमध्ये जसे मृत्यूविषयी मोकळेपणाने बोलतात, तसे भारतीय लोक बोलत नाहीत. त्यामुळे सामाजिक भीती दूर करून मृत्यूबाबत मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. - झेना यार्दे, आयोजक.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.