water pollution
water pollution sakal media
मुंबई

मुंबईतील पाणीप्रदूषणाकडे कानाडोळा; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील समुद्र किनारे (Beach in mumbai) आणि नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता तपासून प्रदूषण, तसेच प्रदूषणास जबाबदार ठरणाऱ्या माध्यमांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण ​​नियंत्रण मंडळाकडे (MPCB) आहेत. मात्र त्यांनी मे २०२१ पासून पाणी गुणवत्ता निर्देशांक जाणूनबुजून रोखून धरल्याचा आरोप होत आहे. एमपीसीबीच्या संकेतस्थळावर देखील याबाबतची कोणतीही माहिती नाही. यामुळे प्रदूषण रोखण्यास (pollution control) मंडळ गंभीर नसून, प्रदूषण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

एमपीसीबीने जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीचा पाणी गुणवत्ता निर्देशांक प्रदर्शित केला आहे. त्यानुसार मुंबई विभागातील माहीम खाडी, गेटवे ऑफ इंडिया, चर्नी रोड, वरळीचा समुद्रकिनारा, सीएसटी पुलाजवळील मिठी नदी, वर्सोवा, नरिमन पॉईंट, मलबार हिल, दादर चौपाटी, जुहू चौपाटी येथील पाणी परीक्षणाचे निर्देशांक देण्यात आले आहेत. त्यात वरील सर्व ठिकाणचे पाणी प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. सीएसटी पुलाजवळील मिठी नदीच्या पाण्याचा दर्जा निर्देशांक अत्यंत प्रदूषित आहे. गेटवे ऑफ इंडिया, चर्नी रोड, वरळी सीफेस, नरिमन पॉईंट, मलबार हिल, दादर चौपाटी आणि जुहूसाठी ती वाईट आहे.

पाण्याचे परीक्षण हे कोरोना टाळेबंदी काळातील आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मुंबईतील सर्व व्यवहार नियमित सुरू झाले. पर्यायाने प्रदूषणाचा स्तर देखील वाढला असण्याची शक्यता आहे. मुंबईतील किनारपट्टीच्या पाण्याची स्थिती वाईट असल्याने एमपीसीबी आपल्या संकेतस्थळावर किनारी भाग आणि आंतर्देशीय नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेचे वर्गीकरण करणारे पाणी गुणवत्ता निर्देशांक प्रदर्शित करण्यात अयशस्वी ठरले आहे, असा आरोप केला जात आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

स्थिती अत्यंत वाईट

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर औद्योगिक आणि इतर संबंधित उपक्रम पुन्हा सुरू झाल्याने पाण्याची गुणवत्ता प्रदूषित ते अत्यंत प्रदूषित होत गेली असावी. जानेवारी ते एप्रिल २०२१ या महिन्यांत एमपीसीबीने मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरील विविध भागांसाठी घेतलेल्या रीडिंगमुळे किनारपट्टीच्या पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असून, हे धक्कादायक असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्राय पिमेंटा यांनी म्हटले आहे.

...असे होते प्रदूषण पातळी मापन


१) पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी जी तंत्रे वापरली जातात, त्याला पाण्याची जैविक ऑक्सिजन गरज अथवा `बीओडी` असे म्हणतात. दुसरे म्हणजे रासायनिक ऑक्सिजन गरज म्हणजेच `सीओडी` असे म्हणतात. हे दोन्ही दर्शक पाण्याची प्रदूषण पातळी दर्शवणारी मापदंडे आहेत.
२) बीओडी म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतूंना पाण्यातील प्रदूषक घटक विघटन करायला लागणारे ऑक्सिजन. सीओडी म्हणजे पाण्यामधील एकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन. या दोन्ही पातळ्या मिलिग्रॅम प्रतिलिटरमध्ये मोजल्या जातात.
३) बीओडी व सीओडी दोन्ही मोजायला वेगवेगळ्या पद्धती आहेत. बीओडी मोजायला कमीत कमी ५ दिवसांचा वेळ द्यावा लागतो; तर सीओडी काही मिनिटात मोजता येते. बीओडी हे जैविक विघटन किती होऊ शकेल याची नोंद देतो; तर सीओडी प्रदूषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो.

४) पाण्याचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी, तसेच प्रदूषण निकष ठरवण्यासाठी बीओडी व सीओडीचा वापर होतो. साधारणपणे सीओडी १०० मिलिग्रॅम/लिटरपेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदूषित आहे, असे मानण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी बीओडीची पातळी शून्य असली पाहिजे.

सागरी जीवांचे प्रमाण कमी


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख कार्यक्रमांतर्गत पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करते. जैव रासायनिक ऑक्सिजनची मागणी महत्त्वाची असून बीओडीची पातळी शून्य, तर सीओडीची पातळी १०० मिलिग्रॅम लिटरपेक्षा जास्त असलेले पाणी प्रदूषित मानले जाते. असे असल्यास उपचारात्मक कारवाईची गरज अधोरेखित होते. किनारी भागात अधिक बीओडी पातळीमुळे मासे आणि सागरी जीवांचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होत आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा​​द्वारे समुद्र किनारीपट्ट्यात पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण होणे गरजेचे आहे. कारण अशा ठिकाणी सापडणारे मासे खाऊन अपाय होण्याचा धोका अधिक आहे. वर्सोवा खाडीजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र असूनही समुद्राच्या पाण्याच्या गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, अशी अनेक प्रकरणे असू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मुंबईतील खाडी आणि नदीमधील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. त्याबाबतचे खरे आकडे लपवले जात आहेत. असे असेल तर मग पाण्याच्या शुद्धिकरणावर खर्च होणारा पैसा जातो कुठे, याबाबत सरकारने उच्चस्तरीय चौकशी करायला हवी.
- गॉडफ्राय पिमेंटा, प्रमुख, वॉचडॉग फाऊंडेशन.

मुंबईतील ठिकाणे पाणी गुणवत्ता स्तर
माहीम खाडी प्रदूषित
गेटवे ऑफ इंडिया प्रदूषित
चर्नी रोड प्रदूषित
वरळी समुद्रकिनारा प्रदूषित
मिठी नदी प्रचंड प्रदूषित
वर्सोवा प्रदूषित
नरिमन पॉईंट प्रदूषित
मलबार हिल प्रदूषित
दादर चौपाटी प्रदूषित
जुहू चौपाटी प्रदूषित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT