मुंबई, ता. १० : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांनी दोषमुक्तीसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंविच्या विविध कलमांतर्गत आणि १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचाही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सुनावणीला उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने दोघांना समन्सही बजावले होते. आता राणांविरोधात आरोपनिश्चिती प्रलंबित असताना त्यांनी ॲड. रिजवान मर्चंट यांच्यामार्फत दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर सादर करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश देऊन सुनावणी २ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.
--
आरोप राजकीय आकसातून
सदर प्रकरणातील खटला आणि आरोपपत्र हा कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, असे राणा यांच्या वतीने याचिकेत म्हटले आहे. खार पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र राजकीय आकसातून आणि बदनामी करण्यासाठी केले आहे, असा आरोप याचिकेतून केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.