पावसाळ्यापूर्वी पश्चिम रेल्वेची जोरदार तयारी
१२६ पंप, ४० पूरमापक; संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईची लोकल पावसाळ्यात ठप्प होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने यंदा पूर्वतयारीवर विशेष भर दिला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचून गाड्या उशिरा धावण्याच्या आणि सेवा विस्कळीत होण्याच्या समस्या टाळण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्यात येत असून, संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या उशिरा धावतात. याचा फटका लाखो प्रवाशांना बसतो. त्यामुळे यंदा पाणी साचण्याची समस्या कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी १५० दिवसांसाठी एकूण १२६ पंप तैनात करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १०४ होती. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त पंप ठेवून तातडीने पाणी उपसा करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे मार्गालगतच्या नाल्यांची साफसफाई वेगात सुरू असून, सुमारे ६० किलोमीटर नाले स्वच्छ केले जात आहेत. तसेच ५८ कल्व्हर्टमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ४० फ्लड गेज बसवण्यात येणार असून, पावसाचे अचूक मोजमाप करण्यासाठी सहा स्वयंचलित पर्जन्यमापक कार्यान्वित केले जाणार आहेत.
‘मक स्पेशल’च्या ६०० फेऱ्या
रेल्वे ट्रॅक, नाले आणि परिसरातील चिखल, गाळ तसेच कचरा हटवण्यासाठी ‘मक स्पेशल’च्या ६०० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या वारंवार निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अतिरिक्त पंप, मनुष्यबळ आणि तांत्रिक पथके तैनात केली जाणार आहेत.
मायक्रो-टनेलचे काम
पाणी निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी मायक्रो-टनेल प्रकल्प राबवण्यात येत आहेत. वांद्रे परिसरातील काही कामे पूर्ण झाली असून, कल्व्हर्ट ६७, ब्रिज ५८A, कल्व्हर्ट १५ आणि ७६ येथे टप्प्याटप्प्याने कामे सुरू आहेत. काही ठिकाणी मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
चार किलोमीटर नवीन नाले
नाल्यांची दुरुस्ती आणि नव्या नाल्यांचे बांधकामही हाती घेण्यात आले आहे. एप्रिलअखेरपर्यंत २.५ किलोमीटर नाल्यांची दुरुस्ती आणि चार किलोमीटर नवीन नाले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, वांद्रे पूर्वेतील नवपाडा परिसरात मोठ्या व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी साचण्याची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच, या पूर्वतयारीमुळे यंदा पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
पाणी निचरा व्यवस्था
- पाणी उपसा पंप : १२६
- तैनाती कालावधी : १५० दिवस
- पूरमापन यंत्र : ४०
- पर्जन्यमापक : ६
नाले व ड्रेनेज कामे
- नाल्यांची साफसफाई : ६० किमी
- नाल्याखालच्या मार्गाची गाळसफाई : ५८
- नाले दुरुस्ती : २.५ किमी
- नवे नाले : ४ किमी
संवेदनशील ठिकाणे
ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड,
माहीम, वांद्रे, खार अंधेरी, जोगेश्वरी, वसई-विरार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.