जव्हार, ता. २६ (बातमीदार) : सध्या वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या तापमान वाढीने हैराण झाले आहेत. अशात जव्हार शहरातील अनेक भागांत कमी दाबाने, त्याचप्रमाणे अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पॅकबंद पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. थंडगार पाण्याने भरलेल्या या जारने नैसर्गिक फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाची जागा घेतली असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून थंडगार पाण्याच्या जारची विक्री जोरात होऊ लागल्याने जव्हार शहर असो की ग्रामीण भागात गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठाची मागणी घटली आहे. यामुळे दिवसभरात उन्हातान्हात फिरून माठांची विक्री होत नसल्याने जारच्या थंडगार पाण्याने माठ विक्रेते बेजार झाले आहेत. पूर्वीच्या काळी थंडगार पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यात माठ, रांजणाला मोठे महत्त्व असायचे. कालांतराने फ्रीज आले; तरीदेखील माठ, रांजण तग धरून होते. काही वर्षांपूर्वी पाणी शुद्ध करून जारच्या माध्यमातून गावोगावी व घरोघर विक्री होऊ लागल्याने शुद्ध व थंड पाण्यासाठी श्रीमंतासह गरीबही त्याला महत्त्व देऊ लागले. यामुळे माठ, रांजण यांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक काबाडकष्ट करून माठ आणि रांजण बनवणारे कुंभार व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. विक्री होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे भविष्यात माठ, रांजण लोप पावतील, अशी खंत परिसरातील कुंभार व्यावसायिकांमधून व्यक्त केली जात आहे.
.....
पाणी शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असून बाजारात अवघ्या तीस रुपयांत जार भरून थंड पाणी मिळते. यामुळे सर्वसामन्य नागरिक जारकडे आकर्षित होऊ लागले आहे. या जारमुळे शुद्ध पाणी स्वच्छ पाणी मिळत असते.
- कल्पेश दिवे, नागरिक
....
जारच्या माध्यमातून पाणीपुरवठा करतो, त्यात आमच्या बाजूलाच सरकारी रुग्णालय असल्याने अनेक नागरिक आमच्या येथून पाणी नेत आहेत. आम्हीदेखील त्यांना विनामूल्य पाणी देऊन एक समाजसेवा करीत आहोत.
- सुमित तारापूरवाला, जार व्यवसायिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.