भाईंदर, ता. २ (बातमीदार) : एकीकडे मिरा-भाईंदर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने विकासकामांना गती मिळत नसल्याची ओरड प्रशासनाकडून केली जात आहे. दुसरीकडे आवश्यक असलेली पदभरती करण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली असतानाही महापालिकेतील भरती गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार मिरा-भाईंदर पालिकेच्या आस्थापनेवर सुमारे दोन हजार ५६४ पदे आहेत. यापैकी एक हजार ७८ पदे रिक्त आहेत. अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचे कारण प्रशासनाकडून नेहमीच पुढे केले जाते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच महापालिकांना रिक्त पदे भरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेने रिक्त असलेल्या पदांपैकी अत्यावश्यक असलेल्या ३३९ पदांची भरती करण्याचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला. या प्रस्तावाला राज्य सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता, लिपिक, सर्व्हेअर व प्लंबर आदी ४५ पदे भरण्याचा निर्णय महापलिकेने घेतला आहे, मात्र या मान्यतेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पदभरती प्रक्रियेला चालना मिळालेली नाही.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक विकासकामे हाती घेतली जातात. त्यावर देखरेख ठेवण्याचे काम कनिष्ठ अभियंत्यांकडून केले जाते, मात्र महापालिकेकडे पुरेसे कनिष्ठ अभियंता नसल्याने ते कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या हाती गाडा
महापालिकेच्या परिवहन सेवेचीदेखील सध्या वाईट अवस्था आहे. या सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूकच करण्यात आलेली नसून परिवहन सेवेचा गाडा अन्य जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून हाकला जात आहे. त्याचा परिणाम सेवेवर होताना दिसून येत आहे. परिवहन सेवेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याचे पद मंजूर आहे, मात्र अद्याप ते भरण्यात आलेले नाही. शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दलही कार्यक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती अत्यावश्यक आहे, मात्र पदभरतीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
खासगी कंपन्यांची मुजोरी
मिरा-भाईंदर पालिकेतील पदभरतीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत महापालिकेकडून कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु प्रक्रिया सुरू करण्यासाठी या कंपनीकडून महापालिकेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडत गेली. अखेर या वर्षी मार्चमध्ये आयुक्तांनी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती रद्द करून आता पदभरतीची जबाबदारी टीसीएस कंपनीकडे दिली आहे, मात्र त्यालाही जवळपास तीन ते चार महिने उलटले असून, भरती प्रक्रियेची हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे महापालिकेकडून पदांची भरती होणार आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पदभरतीसाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुरू आहे. त्याचा आपण स्वत: पाठपुरावा करत आहोत. या प्रक्रियेला गती यावी, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका
पालिकेतील मंजूर पदे २,५६४
रिक्त पदे १,०७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.