गायमुख घाटाचे काम रखडले
वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात अडकले
राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २ : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाचे रुंदीकरण वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात अडकले आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या या वादावर तोडगा निघालेला नाही; मात्र आता पुन्हा हा घाट ३० मीटरऐवजी फाउंटन चौकापर्यंतच्या रस्त्यासह ६० मीटर रुंद करण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे; मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक, नोडल अधिकाऱ्यांनी घाटाबाबत काढलेल्या त्रुटींची पूर्तता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्याने गायमुख घाटापासूनचा ६० मीटर नवा रस्ता फाउंटनपर्यंत कसा मंजूर करायचा, असा प्रश्न वन विभागाला पडला आहे. त्यामुळे घाटाचे रुंदीकरण आणखी लांबणीवर पडणार आहे.
ठाण्यातील घोडबंदर मार्गाला वसई, पालघर, गुजरातची वाहिनी म्हटले जाते. रोज हजारो मालवाहतूक करणारी वाहने या मार्गाने मालाची ने-आण करतात. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडण्याचे काम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेला गायमुख घाट करतो, परंतु हा घाट आता अरुंद झाल्याने तो आता कोंडी करणारा ठरत आहे. घाटाचा उतार आणि चढ मोठा असल्याने त्यावरून जड-अवजड वाहनांची अत्यंत संथ गतीने वाहतूक सुरू असते. घाटावर एखादे वाहन बंद पडले, तर निर्माण होणारी वाहतूक कोंडी फाउंटन आणि ठाण्यादरम्यान पसरते. त्यामुळे या घाटाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून मंजुरीसाठी वन विभागाकडे पाठवण्यात आला.
सार्वजनिक विभागाने घाटाच्या सिमेंट काँक्रीटीकरणासोबतच ४.४७२ हेक्टर जागा घाटावरील सध्याच्या वळणामध्ये सुधारणा करण्यासाठी मागितली आहे. तसा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवला आहे; मात्र या प्रस्तावात अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा नोडल अधिकारी नरेश झुरमुरे यांनी घाटाच्या रुंदीकरणाच्या नऊ त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश ६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येऊर परिक्षेत्र वन विभागाला दिले. त्यामध्ये येऊर वन विभागासाठी दोन आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी सात त्रुटी असल्याचे येऊर वन विभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी सांगितले, तर वन विभागाकडूनच परवानगी मिळत नसल्यामुळे घाटाचे काम रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाच्या वादात गायमुख घाटाचे काम रखडले आहे. त्यातच आता ६० मीटरच्या रुंदीकरणाची घोषणा झाल्याने अनेक अडथळ्यांचा समावेश होणार आहे. परिणामी घाटाच्या रुंदीकरणाचे काम रखडणार आहे. तसेच आणखी काही वर्ष वाहनचालकांना कोंडीची समस्या सहन करावी लागणार आहे.
अडथळ्यांचा डोंगर
घाटाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या त्रुटी दूर केल्या जात नसतानाच आता हा घाट ३० मीटर वरून ६० मीटर रुंद केला जाईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे, मात्र नव्या घोषणेनुसार गायमुख घाटापासून फाउंटन चौकापर्यंत होणाऱ्या ६० मीटर रुंद रस्त्यासाठी अनेक अडथळे उभे राहणार आहेत. वन विभागाची जागा घ्यावी लागणार असून, गौण खनिजांचे उत्खननसुद्धा होणार आहे. हजारो झाडांच्या कत्तली होणार आहेत. सर्वात मोठी अडचण फाउंटन हॉटेलसमोर ठाण्याच्या दिशेने असलेल्या खारफुटींची आहे. याकरिता थेट केंद्राकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अडथळ्यांचा डोंगर समोर असताना हा ६० मीटर रुंद रस्ता कधी होणार, हे सांगणे कठीण असल्याचे दिसते.
आयआयटीची मदत घेणार
२००१ मध्ये गायमुख घाटाचे काम झाले आहे, परंतु टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ते योग्य प्रकारे केले नसल्यामुळे आता प्रत्येक वर्षी त्याची दुरुस्ती करावी लागत आहे. घाटाचा चढ-उतार कमी करण्यासाठी वन विभागाकडे दोन वर्षांपूर्वी परवानगी मागितली. तत्पूर्वी यंदाही पावसाळ्यापूर्वी घाटाचे डांबरीकरणाचे काम केले असून, या कामासाठी आता आयआयटीची मदत घेतली जाणार आहे, असे तत्कालीन उपअभियंते श्रीकांत येवले यांनी सांगितले.
नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाच्या आधारे वन विभागाला सांगितलेल्या दोन त्रुटींची पूर्तता केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची पूर्तता करून अहवाल सादर करायचा आहे; मात्र तो अद्याप झालेला नाही.
- प्रदीप पाटील, उपसंचालक, वन विभाग येऊर (उत्तर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.