ज्ञानदेव वानखेडेंची याचिका फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार नवाब मलिक यांनी केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी करून न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केल्याचा दावा करणारी अवमान याचिका शुक्रवारी (ता. ११) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिका दाखल केली.
समाजमाध्यमांवरील मजकूर मलिक यांनी न्यायालयात पूर्वी दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करणारा नाही, बदनामीचा मूळ दावा महानिबंधक कार्यालयाने नमूद केलेल्या त्रुटी न केल्यामुळे आधीच फेटाळल्याचेही न्या. महेश सोनक आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने वानखेडे यांची अवमान याचिका फेटाळताना स्पष्ट केले. शुक्रवारी सुनावणीदरम्यान, ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेला मूळ बदनामीचा खटला प्रक्रियात्मक त्रुटींमुळे आधीच फेटाळण्यात आल्याची माहिती मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. तसेच, मूळ याचिकाच अस्तित्वात नसताना अवमान केल्याचा प्रश्नच उद्भवत नसल्यचा दावाही केला. न्यायालयाने मलिक यांचा युक्तिवाद मान्य केला आणि त्यांनी हमीपत्राचे उल्लंघन केलेले नाही, असे नमूद करून ज्ञानदेव यांची याचिका फेटाळली.
काय प्रकरण?
ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरुद्ध मानहानीचा दावा करून मलिक यांना वानखेडे कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक विधाने करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. त्यानंतर मलिक यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल विनाअट माफी मागितली होती. त्यानंतर मलिक यांना केवळ समीर वानखेडे यांच्या अधिकृत गैरवर्तनाशी संबंधित विधाने करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.