अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : अंबरनाथच्या हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक (स्तंभ) दुर्लक्षित झाला आहे. अनेक वर्षांपासून या स्मारकाला उद्यानातील कोपऱ्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर मोठ्या दिमाखात उभारलेल्या या स्मारकाकडे पालिका अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते. देशभरात कारगिल दिवस साजरा होत असताना, पालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी याकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही.
शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला उड्डाणपुलाने जोडणाऱ्या चौकात पूर्वेकडे हुतात्मा स्मारक (स्तंभ) साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी सुशोभीकरणाच्या नावाने या हुतात्मा स्मारकाला मुख्य चौकातून हटवून मागे असलेल्या मधु मंगेश कर्णिक उद्यानाच्या कोपऱ्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, स्थलांतरित झाल्यापासून हे स्मारक दुर्लक्षित झाले आहे. हे स्मारक पुन्हा मुख्य चौकात स्थलांतरित तरी करावे; अन्यथा त्याचे विधिवत विसर्जन करावे, अशी मागणी केली जात आहे. सध्या हा स्तंभ दुर्लक्षित झाल्याने भविष्यात त्याची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शनिवारी (ता. २६) कारगिल विजय दिन देशभरात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून एकही पालिका प्रशासन अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी तिथे फिरकलेही नाहीत.
एके काळी या चौकात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मुंबई प्रांताचे तत्कालीन आमदार पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे हे वास्तव्यास होते. या चौकाचे सुशोभीकरण करून तेथे हुतात्मा स्तंभ अर्थात स्मारक उभारण्यात आले होते. या स्मारकाला प्रत्येक राष्ट्रीय सणांच्या प्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देत होते. त्यामुळे या ठिकाणाला हुतात्मा चौक असेही म्हणत होते. मात्र, या सगळ्याला एक काळ उलटला असून सद्यपरिस्थितीत त्याचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळते.
मिशन सिंदूरवेळी तिरंगा रॅली
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर त्याला चोख उत्तर देताना मिशन सिंदूर राबविण्यात आले. राजकीय पक्षांनी तिरंगा रॅली सर्वत्र काढली होती. अंबरनाथ शहरातही विविध पक्षांनी तिरंगा रॅली काढून याचा समारोप या हुतात्मा चौकात केला होता. मात्र, एकाही पदाधिकाऱ्याने वा कार्यकर्त्याने उद्यानात असलेल्या या हुतात्मा स्तंभाला ना पुष्पचक्र अर्पण केले, ना साधे एखादे फुल अर्पण करून मानवंदना दिली.
उद्यान विभागामार्फत स्वच्छता
अंबरनाथ नगर परिषदेच्या उद्यान विभागामार्फत या स्तंभाजवळ नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. मात्र, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, कारगिल दिन, शहीद दिन अशा कोणत्याही दिवशी ना लोकप्रतिनिधी या चौकात येतात, ना प्रशासकीय अधिकारी या चौकात येऊन मानवंदना देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते आहे.
सरकारी निर्देशानुसार शासकीय व निमशासकीय जयंती, राष्ट्रीय कार्यक्रमांची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार कार्यक्रम पार पाडले जातात. यातील एकाही राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी या स्तंभाला भेट, मानवंदना दिली नाही. कारण तसे सरकार निर्देश प्राप्त झाले नाही.
- उमेश राऊत, उपमुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.