पुनर्वसनाच्या जागेसाठी
२४ तासांत जागा शाेधा
उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य जागा मिळत नसल्यावरून उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १३) राज्य सरकारला धारेवर धरले. न्यायालयाने आदेश देऊनही २४ वर्षे उलटूनही झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी सरकारने काहीच केले नाही. पुनर्वसनासाठी सरकारला जागा मिळत नाही, हे कारण पटण्यासारखे नाही, असे सुनावून २४ तासांत जागा निश्चित करा अन्यथा अवमान कारवाईला सामोरे जा, असा इशारा न्यायालयाने सरकारला दिला.
पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी अनेक जागा शोधण्यात आल्या; परंतु त्या योग्य नव्हत्या. त्यामुळे हे पुनर्वसन होऊ न शकल्याची माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिली. सर्व जागा या सरकारच्या अधिकार क्षेत्रात असताना सरकार जागा मिळत नसल्याचे कारण सांगू शकत नाही, असे मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने खडे बोल सुनावले. तसेच या पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात कुठेही जागा उपलब्ध होऊ शकत नाही का, असा प्रश्न केला. तेव्हा हे झोपडीधारक या परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्यामुळे उपजीविकेच्या दृष्टीने त्यांचे पुनर्वसन करताना विचार करावा लागत असल्याचे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगताच खंडपीठाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अथवा त्याऐवजी निवृत्त अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांना हुतात्मा चौकात घरे अपेक्षित
झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना उपजिविकेचा विचार करता; पण उच्च न्यायालयाचे कर्मचारी दोन तास लोकल प्रवास करून न्यायालयात पोहोचतात. त्यामुळे त्यांची सोय म्हणून त्यांनाही हुतात्मा चौकात घरे देणे अपेक्षित आहे, अशी काेपरखळी न्यायालयाने मारली.
प्रकरण काय?
न्यायालयाने १९९५ मध्ये राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे आदेश दिले होते. त्यानंतर काही झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन न केल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.