पळसदरी–कर्जत मार्गावर प्रवास धोकादायक
मोबदला न मिळाल्याने रस्त्याचे काम रखडले
अपूर्ण कामामुळे मोठे खड्डे; महिन्याला अपघातांची मालिका
खालापूर, ता. १९ (बातमीदार) : खालापूर–पळसदरी मार्गे कर्जतला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. शेतकऱ्यांना जमीन संपादनाचा मोबदला न मिळाल्याने वारणे, अंजरूण, नावंढे व हाळ परिसरात काम थांबले असून अपूर्ण भागात रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे, अचानक दोन मार्गिकेचा रस्ता एकमार्गी होणे तसेच रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहेत. महिन्याला किमान एक जीवघेणा अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५४८ अंतर्गत असलेल्या या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित भागात पूर्वीचा डांबरी रस्ताही उखडला गेला आहे. नावंढे परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे बाजूपट्टीवर माती साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शेतकरी किरण हाडप यांनी, “वडिलोपार्जित जमीन गेली; मात्र मोबदला मिळालेला नाही,” अशी नाराजी व्यक्त केली. मोबदला कोणत्या विभागाने द्यायचा याबाबत निर्णय प्रलंबित असल्याचे एमएमआरडीचे निवासी अभियंता उमेश माने यांनी सांगितले.
चौकट
मोबदला प्रलंबित; कामाला ब्रेक
शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न सुटला नसल्याने रस्त्याचे काम थांबले आहे. संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने प्रकल्प रखडला असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने निर्णय घेतल्यास अपघातांची मालिका थांबू शकते, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.