मोहफुल वेचण्यासाठी भटकंती
जव्हारमधील आदिवासींची उदरनिर्वाहासाठी धडपड
जव्हार, ता. २ (बातमीदार)ः तालुक्यात निसर्गनिर्मित जिन्नसांद्वारे आदिवासी नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन हे ऋतुचक्रानुसार उपलब्ध होत आहे. सध्या मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने आदिवासी भटकंती करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील आठवडा बाजार ओस पडल्याचे चित्र आहे.
जव्हार तालुक्यात १० दिवसांपासून मोहफुल गोळा करण्याचा हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनजीवन जंगलाकडे वळले असून, याचा थेट परिणाम आठवडा बाजारावर दिसून येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आठवड्यातील निरनिराळ्या ठिकाणी भरत असलेला गजबजलेला बाजार मंगळवारी ओस पडल्याचे चित्र होते.
आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात मोहफुल संकलनासाठी जंगलात जात आहेत. अनेक कुटुंबे शेतातील झोपड्यांमध्ये मुक्काम करतात. साधारणतः ३० दिवस चालणाऱ्या हंगामात मोहफुल गोळा करणे हेच प्रमुख काम असल्याने तालुक्याच्या ठिकाणी येण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. यामुळे जव्हार शहरातही गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागरिकांची संख्या कमी जाणवत आहे. ग्राहकांचा अभाव असल्याने बाजारातील उलाढाल कमी झाली आहे. परिणामी,भाजीपाला, धान्य, किराणा तसेच इतर वस्तू विक्रेत्यांना फटका बसत आहे.
---------------------------------------
पहाटे ५ पासून धावपळ
जव्हार तालुक्याच्या दुर्गम भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला पहाटे ५ पासून मोहफुल संकलनासाठी जंगलात जातात. मोहफुल हंगामानंतर झाडांवरून टोळी निघण्याचा काळ सुरू होतो. त्यामुळे आणखी काही दिवस ग्रामीण भागातील नागरिकांची बाजारपेठेकडे पाठ फिरलेलीच राहण्याची शक्यता आहे.