सांगली : राज्यातील तब्बल 64 लाख 52 हजार लघुदाब वीज ग्राहकांनी (अकृषक) 1 एप्रिल 2020 पासून वीज बिलच भरले नाही. त्यांच्याकडील वीज थकबाकी 11 हजार 277 कोटी रुपये इतकी आहे; तर कृषीसह 98 लाख 5 हजार वीज ग्राहकांची थकबाकी 47 हजार कोटी रुपये इतकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांना गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक सदस्यांपासून ते जिल्हास्तरावर पालकमंत्री, खासदार, आमदारांची मदत घेण्याच्या सूचना आहेत. लोकप्रतिनिधी वसुली किती महत्त्वाची ते ग्राहकांना समजून सांगून भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करतील.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सुरक्षेसाठी 26 मार्चपासून मीटर वाचन, बिल वाटप बंद करण्यात आले. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रेही बंद करण्यात आली. ग्राहकांच्या सोयीसाठी ऑनलाईन बिल भरण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. परंतु ऑनलाईन बिल भरण्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी थकबाकी वाढत गेली. एक जूनपासून मीटर वाचन व बिल वाटप सुरू केले. परंतु वसुलीचे प्रमाण खूप कमी राहिले.
लॉकडाऊन काळात तीन महिन्यांचे एकत्रित बिल देण्यात आले. ही रक्कम जास्त होती. या काळातील बिले माफ करावीत म्हणून आंदोलने झाली. त्यामुळे अनेकांनी बिले भरली नाहीत. साहजिकच थकबाकी वाढत गेली. तीन महिन्यांचे बिल बरोबर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. शंका दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. परंतु अजूनही अनेकांनी माफीच्या आशेवर वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे.
थकबाकीने महावितरणच्या अडचणी वाढल्यात. वसुलीसाठी मोहीमच सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रातील वसुलीसाठी सूचना आहेत. गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक सदस्यांपासून ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यापासून ते नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर आणि आमदार, खासदार, पालकमंत्री यांची वसुलीसाठी मदत घेतली जाणार आहे. अधिकारी लोकप्रतिनिधींची भेट घेतील. वीज बिल वसुली किती महत्त्वाची हे ग्राहकांना समजून सांगावे यासाठी विनंती करतील.
डिसेंबरअखेर वसूल करा
वीज ग्राहकांची थकबाकी आणि चालू बिल वसुली डिसेंबर 2020 अखेर वसुल करावी, अशा सूचना महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दिल्या आहेत. ज्या ग्राहकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांना टप्पे पाडून देण्यात येतील. वीज बिलाबाबत शंका असल्यास समुपदेशन केले जाईल. जास्त थकबाकी असल्यास ग्राहकांना अधिकारी प्रत्यक्ष भेट देतील. यासह इतरही सूचना वसुलीसाठी देण्यात आल्या आहेत.
एकूण बाकी 47 हजार कोटी
1 एप्रिल 2020 पासून वीज बिलापोटी कोणतीच रक्कम न भरलेल्या राज्यातील ग्राहकांची संख्या 64 लाख 52 हजार आहे. ऑक्टोबरअखेरची थकबाकी 11 हजार 277 कोटी रुपये आहे. कृषी ग्राहकांची संख्या 33 लाख 53 हजार असून, त्यांच्याकडे थकबाकी 35 हजार 726 कोटी रुपये आहे. लघुदाब आणि कृषी ग्राहक मिळून 98 लाख 5 हजार थकबाकीदार ग्राहक आहेत. एप्रिलपासूनची थकबाकी 47 हजार कोटी आहे.
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.