सांगली : कोयना धरणात १८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. एरवी हा साठा पुरेसा मानला जातो, मात्र यावर्षी अवर्षणाची शक्यता आहे. जुलैअखेरपर्यंत पाणी योजना चालवाव्या लागल्या तरी चालवा, असे शासनाचे आदेश आहेत.
त्यातच कर्नाटक सरकारने सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. या काळात एवढे पाणी देणे जवळपास अशक्य आहे. राज्य सरकार या स्थितीत काय मार्ग काढते, याकडे लक्ष असेल. कर्नाटक सरकारकडून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत पाण्याची मागणी नोंदविली जाते.
हिप्परगी धरणातील पाणीसाठा तळाला गेला की हिप्परगीपर्यंतच्या उत्तर कर्नाटक भागात पाणी टंचाई जाणवू लागते. कोयनेतून दरवर्षी दोन ते तीन टीएमसी पाणी कर्नाटकला सोडले जाते. काही वर्षे आधीपर्यंत हे पाणी विकत दिले जात होते.
मध्यंतरी जत तालुक्याला कर्नाटकातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर कोयनेतून पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने सीमावर्ती जत भागाला त्यांच्या योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी पुढे आली. त्यावर बराच खल अजूनही सुरू आहे.
यावर्षी कर्नाटकने सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. कोयना धरणात १८ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. टेंभू आणि ताकारी योजनांचे आवर्तन सुरू आहे. त्यासाठी सुमारे पाच ते सहा टीएमसी पाणी लागेल, शिवाय नदीकाठची शेती, नगरपालिका, महापालिका आणि गावांच्या पिण्यासाठी पाणी तीन टीएमसी लागेल.
अशी एकूण ९ टीएमसी पाण्याची गरज आहे. जून महिन्याअखेर १० टीएमसी पाणी शिल्लक ठेवण्याचे कोयना धरण प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानंतर पाऊस लांबला तर हाच साठा उपयुक्त ठरणार आहे.
पाणी दिल्यास करार हवा
कर्नाटकला या स्थितीतही दोन ते तीन टीएमसी पाणी देणे शक्य होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे, कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. याआधी महाराष्ट्राने कर्नाटकला विकत पाणीपुरवठा केला होता.
गेल्या काही वर्षांत कर्नाटकने जत सीमा भागातील शेतीला पाणी पुरवठा केला आहे, मात्र तो कागदोपत्री नाही. तसा कोणताही करार नाही. यावेळी कर्नाटकला पाणी देताना सीमा भागातील योजनांतून जतच्या शिवारात पाणी सोडण्याबाबत करार व्हावा, अशी अपेक्षा आहे.
चांदोलीत १३ टीएमसी
चांदोली धरणात सध्या १३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. यापैकी ५.६९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प आणि वारणा नदीकाठासह कृष्णेवरील राजापूरपर्यंतच्या गावांना पाण्यासाठी व शेतीसाठी हा साठा पुरेसा आहे.
जत तालुक्यात अद्याप पुरेसे पाणी पोचलेले नाही, परिणामी जूनमध्ये म्हैसाळचा सहावा टप्पा पूर्ण क्षमतेने चालवावा लागेल आणि त्यासाठी हा साठा गरजेचा असणार आहे.
कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा १८ टीएमसी असून यापैकी वीज निर्मिती, सिंचन, पिण्यासाठी ८ ते ९ टीएमसी पाणी राखीव ठेवावे लागेल. पाऊस लांबला तर पाण्याची तजवीज महत्त्वाची आहे.
- नीलेश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.