काजू बोर्डाचे मुख्य कार्यालय चंदगडला करावे
डॉ. चेतन नरके यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ : काजू बोर्डाचे मुख्य कार्यालय चंदगड येथे करावे, अशी मागणी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि सीमा भागातील बेळगाव, खानापूर, कारवार भागात काजूचे मोठे क्षेत्र आहे. चंदगड हे ठिकाण एकूण काजू पिकाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे. त्यामुळे या पिकाच्या विकासासाठी चंदगड येथे काजू बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी या विभागातील शेतकरी, काजू प्रक्रिया उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी केली. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारकडे निवेदने, अर्ज पाठवले. सह्यांची मोहीमही राबवण्यात आली. मात्र शासनाने काजू बोर्ड स्थापन करताना मुख्य कार्यालय वाशी (मुंबई) येथे तर विभागीय कार्यालये सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चंदगड विभागाला वंचित ठेवल्याच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या पिकाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर काजू बोर्डाचे मुख्य कार्यालय चंदगड येथेच होणे गरजेचे आहे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.