‘‘राज्यात गेल्या अडीच महिन्यांत सुमारे १० लाख लोकांनी ईव्हीएमची चाचणी केली. त्यातील एकाचीही तक्रार आली नाही.''
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना आता घरात बसूनच मतदान (Voting) करता येणार आहे. यासाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांत ‘१२ डी’ हा अर्ज या व्यक्तींना देण्यात येईल. त्यानंतर मतदान केंद्रावर येता येणार नाही, अशांची नोंदणी केली जाईल. अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ८० हजार व्यक्ती आहेत, तर ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व (Disability) असणाऱ्यांची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. यापैकी ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही त्यांचे मतदान त्यांच्या घरी जाऊन अधिकारी करून घेतील.
निवडणुकीच्या बंदोबस्तावर असणारे पोलिस कर्मचारी, निवडणूक कर्मचारी यांचेही मतदान प्राधान्याने होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.’’ यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.
निवडणुकीत पैसे, मद्य यांचे आमिष मतदारांना दाखवले जाते. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थही सापडले आहेत. त्यामुळे निवडणुकीत अमली पदार्थांचा वापर करू नये, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ई.एस.एम.एस प्रणाली बनवण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या तपास यंत्रणा, प्रशासन अशा २२ विभागांचा समन्वय करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने के. वाय. ई ॲप बनवले आहे. हे सर्वांना सहज उपलब्ध आहे. यावर उमेदवारांची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यांचे शिक्षण, संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे यासह अन्य माहितीही उपलब्ध होणार आहे.
आचारसंहितेच्या काळात आपल्या परिसरात पैसे, मद्य किंवा वस्तू वाटप सुरू असेल, तसेच अन्य कोणत्या प्रकारे आचारसंहितेचा भंग होत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. यासाठी ‘सी ॲप’ बनवण्यात आले आहे. याद्वारे नागरिक अनुचित प्रकाराची छाचायित्रे आणि व्हिडिओ पाठवू शकतात. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाते. तक्रार केल्यानंतर पुढील शंभर मिनिटात तेथे कारवाई होते, असेही देशपांडे म्हणाले.
‘ईव्हीएम’च्या पारदर्शकतेबाबत देशपांडे म्हणाले, ‘‘राज्यात गेल्या अडीच महिन्यांत सुमारे १० लाख लोकांनी ईव्हीएमची चाचणी केली. त्यातील एकाचीही तक्रार आली नाही. या यंत्राला कोणतीही कम्युनिकेशन सिस्टीम नसल्याने ते हॅक करता येत नाही. कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर मशीन बंद पडते. ईव्हीएम पूर्ण पारदर्शक आहे.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.