भिलार - महाबळेश्वर येथील केट्स पॉइंटवर सांगली येथील प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अविनाश आनंदा जाधव आणि तेजश्री नलावडे (दोघेही रा. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. पाचगणी पोलिसांनी सांगितले, की आज सकाळी अविनाश आणि तेजश्री यांनी वसंत नारायण जाधव (रा. अवकाळी) यांची टॅक्सी महाबळेश्वर येथून सकाळी साडेसात वाजता भाड्याने केली. केट्स पॉइंटवर गेल्यावर दोघेही शेजारील जंगलात फिरायला गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत, हे लक्षात आल्यावर टॅक्सीचालक जाधव यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने आजूबाजूला शोध घेतला. झाडीत काही अंतरावर हे दोघेही झाडाला लटकलेले दिसले. जाधव यांनी याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात कळविले. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे घटनास्थळी दाखल झाल्या. दोघेही मृत झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास करता अविनाश जाधव हा सांगली येथील मानसिंग सहकारी बॅंकेत नोकरीला होता, असे समजले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. या युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात नमूद केले आहे, "आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो. तसेच आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकलो नसतो म्हणून आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आता वाद करू नयेत. भांडणे केली तर आमच्या आत्म्यास शांती मिळणार नाही.' अधिक तपास एम. व्ही. सावंत, व्ही. एस. फडतरे, नंदकुमार कुलकर्णी, ए. एस. बाबर, पी. एन. फडतरे, एस. डी. शेळके, भरत जाधव, सौ. व्ही. एस. वझे , एस. जी. नेवसे, एम. ए. फुलसुंदर, पी. एस. जगताप व त्यांचे सहकारी करीत आहेत. |