संगमनेर ः मागणीपेक्षा कमी बस दिमतीला असतानाही केवळ योग्य नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वय व सहकार्यातून प्रवाशांना सेवा देताना संगमनेर-पुणे या मार्गावर आठ दिवसांत 146 फेऱ्यांतून 10 लाख 47 हजार 325 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न घेण्याची किमया संगमनेर आगाराने केली. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमनेर शहरातून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्याची सोय आहे. संगमनेर बसस्थानकात उन्हाळी सुटी व दिवाळीसारख्या उत्सवादरम्यान प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यातून अनेकदा वाहतुकीचे नियोजन करणे जिकिरीचे होते. या मार्गावरील नाशिक-पुणेदरम्यान प्रवाशांची मोठी संख्या असल्याने दिवाळीच्या कालावधीत 28 ऑक्टोबर (पाडवा) ते 3 नोव्हेंबरदरम्यान संगमनेर आगाराने संगमनेर ते पुणे या 22 हजार 13 किलोमीटरच्या 146 फेऱ्या केल्या. त्यातून आगाराच्या उत्पन्नात खसखशीत वाढ झाली. मागील वर्षी या मार्गावर 82 फेऱ्या झाल्या होत्या. यावर्षी सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न आगाराने मिळविले आहे. आगारप्रमुख प्रियांका उनवणे यांनी सर्व अधिकारी, चालक-वाहक व यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या नियोजनात सहभागी करून घेतले. त्यासाठी संगमनेर आगारातून शाळा-महाविद्यालयासाठी असलेल्या बसचा वापर करण्यात आला. ग्रामीण भागातील एकही ठरलेली फेरी टाळली नाही. त्यासाठी चालक-वाहकांनी त्यांच्या सुट्या रद्द करून, "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रीदवाक्य खरे करण्याचा चंग बांधला होता. पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांग, सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धकाचा वापर, यामुळे चांगल्या प्रकारे सेवा देता आली. त्यामुळे बसस्थानकावरील अतिरिक्त गर्दी टळली. चोरी, पाकिटमारी यांसारख्या प्रकारांना आळा बसला. या सुविधेमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विभागीय नियंत्रक कार्यालयाने दिलेली परवानगी व संगमनेर आगाराचे चालक-वाहक, तसेच इतर अधिकारी, यांत्रिकी विभागाचा समन्वय व सहकार्यामुळे एका आठवड्यात आगाराच्या उत्पन्नात वाढ करण्यात या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. प्रियांका उनवणे, आगारप्रमुख, संगमनेर |