सांगली : कोरोना महामारीमुळे गेले अडीच महिने रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या रिक्षा चालकांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. मात्र सरकारने रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी (ता. 15) मिरजेत रक्तदान करुन आपला निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती रिक्षा व्यवसाय बचाव कृतीसमितीच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली.
माजी आमदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ रिक्षा संघटनांची आज बैठक झाली. यावेळी सरकारच्या निषेधार्थ रक्तदान आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री. शिंदे म्हणाले, कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे रिक्षा व्यवसाय पुर्ण ठप्प आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे 50 हजार जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटक, आंध्र या राज्यांनी आपल्या रिक्षा चालकांना पाच हजारपासून दहा हजारपर्यंत मदत दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांनाही सरकारने दहा हजार रुपयांची मदत द्यावी.
ऍपे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले म्हणाले, आम्ही दरवर्षी सरकारला सुमारे 15 हजार रुपये कर भरतो. आज प्रथमच आम्हाला सरकारकडे मागण्याची वेळ आली आहे. अन्यथा आम्ही रक्तदान आंदोलन करणार आहे. त्यानंतर मुंडण आंदोलन करणार आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही लॉकडाऊन तोडून रस्त्यावर उतरु. उपाशी मरण्यापेक्षा कोरोनाने मरु अशी वेळ आमच्यावर आली आहे. नाहीतर आम्हाला कुटुंबासह आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.
महापालिका क्षेत्रात सात हजार रिक्षा चालक असून व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर कांदे, बटाटे विकणे, गवंड्याच्या हाताखाली कामाला जाणे, एमआयडीसीत कामाला जाण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.