साखर आयुक्त शेखर गायकवाड
साखर आयुक्त शेखर गायकवाड sakal
सोलापूर

Sugar Commissioner Shekhar Gaikwad: कारखानदारांना धारेवर धरणारे साखर आयुक्त शेखर गायकवाड सेवानिवृत्त, कौतुकाचा वर्षाव...

- अभय दिवाणजी

आमचे स्नेही आणि गेल्या ३१ वर्षांपासून सहकारी असलेले अभय दिवाणजी आता भाषण करतील. या वाक्याने प्रचंड गराड्यात असलेला मी अचानक भानावर आलो आणि थेट व्यासपीठावर जावून राज्यातील अती उच्च व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर बोलू लागलो. निमित्त होते... साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निवृत्ती सोहळ्याचे!

हो तो एक सोहळाच होता... प्रदीर्घ अशा 36 वर्षांच्या सेवेनंतर श्री. गायकवाड म्हणजे राज्यातील तरुणाईचे गुरु निवृत्त झाले. प्रथम कृषी अधिकारी नंतर उपजिल्हाधिकारी पदापासून त्यांच्या प्रशासकीय सेवेस सुरवात झाली. आजपासून बरोबर ३१ वर्षांपूर्वी त्यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यावेळी त्यांची झालेली भेट आजही स्मरते. त्याचे कारणही तसेच आहे.

नेहमीचेच कथानक... मी मूळचा अक्कलकोटचा... त्यावेळेस कॉलेजच्या अंतिम वर्षात असताना बातमीदारी करत होतो. अक्कलकोटचे तत्कालिन परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी आणि विद्यमान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर त्यानंतर तत्कालिन तहसिलदार व विद्यमान आएएस अधिकारी कुमार खैरे यांच्याशी मैत्री झाली. श्री. खैरे यांच्यासाठी तर मुलगी पाहण्यापासून लग्नापर्यंतच्या सोबतीची आठवण आजही ताजी आहे.

अक्कलकोटला असल्याने बातम्या, कार्यक्रमासाठी श्री. राजेनिंबाळकर यांच्याशी दैनंदिन संवाद असे. ते नेहमी म्हणायचे, ‘कसली पत्रकारिता करतो. स्पर्धा परीक्षा दे, मोठा सायब होशील.‘ अगदी जिव्हाळ्याचे, सलोख्याचे संबंध. पण पत्रकारितेचाच विडा उचलल्याने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले.

श्री. राजेनिंबाळकर नंतर सोलापूरचे उपजिल्हाधिकारी, रजा राखीव उपजिल्हाधिकारी, पंढरपूरचे प्रांत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशा विविध पदांवर सोलापुरात कार्यरत होते. त्यांच्यानंतर उपजिल्हाधिकारी पदावर त्यावेळेस शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. आपल्या मित्राच्या जागी हे कोणीतरी गायकवाड आले आहेत, ते कसे असतील, असा आपसूकच प्रश्‍न होता. याकाळात सोलापुरातील पत्रकारितेचा श्रीगणेशा केला होता.

परंतु तहसिलदार खैरे यांनी अक्कलकोटच्या सांगवी जलाशयातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यासाठी आलेल्या श्री. गायकवाड यांची जेव्हा भेट झाली आणि अगदी स्नेहपूर्ण ऋणानुबंध जुळले ते आजतागायत म्हणजे तब्बल ३१ वर्षे कायम आहेत. राज्यभरात त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी भेटण्यास जाण्याचा शिरस्ता कायम राहिला. बारामतीचे उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी हाताळलेल्या एका गंभीर प्रकरणाचा मी व (कै.) डॉ. किशोर शांताबाई काळे असे दोघे साक्षीदार.

श्री. गायकवाड म्हणजे त्यावेळेस शिकाऊ किंवा प्रशिक्षणार्थी असलेल्या आमच्यासारख्या सर्वांचेच मार्गदर्शक. त्यात नयना खांडेकर, अमर जाधव, संजय शिंदे, अशोक काकडे, आनंद पाटील (आरटीओ) अशी मोठी यादीच होईल. चित्रकला, वळणदार अक्षरापासून ते जीवनाचे अनुभव, व्यवहाराच्या उसवलेल्या गोधडीच्या विणपर्यंत त्यांनी अक्षरशः घडविले.

त्यावेळेस ते बॅचलर, त्यामुळे त्यांचे निवासस्थान म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी दिनेशकुमार जैन यांच्याकडे होणाऱ्या बैठकीस आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे विश्रांतीस्थान. त्यांच्या बंगल्याची एक चावी आम्हा मित्रांकडेच असे. त्यामुळे त्यांचे घर म्हणजे आपले हक्काचे ठिकाणच. गांधीनगर येथील आताचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान (एकेकाळी सोलापूरचे सहायक जिल्हाधिकारी मोरारजीभाई देसाई, आसीएस तेथे रहात होते) येथे सर्वजण जमत. एकत्रित जेवण, विश्रांती आणि गुरुंसोबत गप्पा. श्री. गायकवाड यांना सर्वजण आदराने गुरुच म्हणत. आजही ती हाक कायमच आहे.

महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेले सर्व अधिकारी श्री. गायकवाड यांच्या बंगल्यावरच असणार असे जिल्हाधिकारी श्री. जैन यांना माहिती असायचे. त्यामुळे जेवणाच्या सुट्टीनंतर ते श्री. गायकवाड यांनी सर्वाना घेऊन या आता... असा निरोप देत होते. त्यावेळेस महाप्रलंयकारी अशा किल्लारीच्या भूकंपावेळी श्री. जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे व पत्रकारितेमुळे त्यांची कायम सोबत असल्याने मला ते सारे जवळून पाहता आले. ती टिम लई भारीच होती, असेच म्हणावे वाटते. त्यांनी दिलेदा अक्कलकोट संस्थानसंदर्भातील एक ऐतिहासिक निकालही आठवतो.

‘सकाळ'च्या वर्धापन दिनासाठी निवृत्त मुख्य सचिव व लोकपाल सदस्य दिनेशकुमार जैन (दिल्ली) यांना बोलावल्यानंतर एका मिनिटात त्यांनी आमंत्रण स्वीकारले. त्यातून १९९२-९३च्या महसूल अधिकाऱ्यांच्या बॅचचे गेट-टु-गेदर करण्याची योजना यशस्वी झाली.

कॉलेज अथवा शाळेतील एका बॅचचे गेट-टू-गेदर अगदी सहज होते. परंतु त्या काळातील अधिकाऱ्यांना एकत्र करणे मोठे जिकिरीचे काम होते. यासाठी अपर जिल्हाधिकारी दीपक नलावडेंची मिळालेली साथ मोलाचीच होती. ‘सकाळ'च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील कसलेल्या वक्त्याप्रमाणे त्यांचे भाषण प्रचंड भाव खावून गेले.

तत्कालिन जिल्हाधिकारी श्री. जैन घर ते आॅफिस जाण्या- येण्यासाठी क्वचितच सरकारी वाहन वापरत. असे पायी जाताना अनेकवेळा त्यांच्यासोबत गप्पा रंगत. त्या काळात क्राईम व महसूल असे बीट माझ्याकडे होते. यातून या बॅचच्या अधिकाऱ्यांसमवेत तुळजापूर पायी वारीही झाली. या वारीला विरोधही झाला होता.

तेव्हा ‘पराचा कावळा‘ या मथळ्याखाली स्फुटही छापले होते. पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या निवास योजनेला विनाविलंब परवानगी दिल्याने स्व. अण्णांनी श्री. गायकवाड यांना घरी भोजनाला घेऊन येण्याची माझ्यावर जबाबदारी दिली होती. आमच्यासारख्या सर्वांवर मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्या अण्णांचे त्यांच्यावरही निरलस प्रेम होते.

मुख्यमंत्र्याचे, मंत्र्यांचे पीएस असे मंत्रालयात काम केल्यानंतर त्यांनी नासिकचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तेथे कार्यालयात वेटींगमध्ये बसणाऱ्यांसाठी त्यांनी स्वतः लिहिलेली उपयुक्त माहितीप्रद पुस्तके उपलब्ध करुन दिली होती.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना महसूल वाढीचा त्यांचा प्रयोग व नंतर सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी लातूरला जलदूत रेल्वेने केलेला पाणीपुरवठा देशभर गाजला. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, भूजल विकास प्राधीकरणात त्यांनी केलेले काम छाप पाडण्यासारखेच होते. साखर आयुक्त म्हणून त्यांनी दिशादर्शक काम करुन एक वेगळा ठसा उमटवला. राज्यातील तरुण चेअरमनना ते वैयक्तिक मार्गदर्शन करत असत.

राज्यातील साखर कारखानदारी बड्या राजकारण्यांच्या हाती असतानाही उसाच्या एफआरपीचा प्रश्न आपल्या कुशल प्रशासनातून कायद्याच्या चौकटीचा बारीक अभ्यास करुन मार्गी लावण्याचे कसब त्यांनी लीलया पार पाडले. यातून नाडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. एफआरपी देणाऱ्या रे व न देणाऱ्या कारखान्याचे रॅकींग ऑनलाइन टाकून ऊस उत्पादकांना जागे केले. हे मोठे अडचणीचे व आव्हानात्मक काम होते. या निर्णयाचे नीती आयोगाने कौतुक केले. साखर उद्योगात असे अनेक नवनवे प्रयोग केले. इथेनॉल संदर्भात धाडसी निर्णय घेतला.

श्री. गायकवाड यांचा निवृत्ती सोहळा साखर संकुल येथे पार पडला. या समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात राज्यातील प्रशासनातील मातब्बर मंडळी उपस्थित होती. निरोप देण्यासाठी भली मोठी रांग होती. आपल्या नंबरबाबत साशंक होतो. पण थेट नाव पुकारल्याचा फायदा झाला अन् व्यासपीठावर गेलो.

सर्वांच्या भेटीने जुन्या स्मृतीस उजाळा तर मिळालाच. त्याचबरोबर काही नव्यांच्या ओळखीही झाल्या. सकारात्मक वाटचाल करणाऱ्या एका पत्रकाराच्या आयुष्यातील ही एक मोठी जमेचीच बाजू. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते पुन्हा एका नव्या मार्गदर्शकाच्या रुपात भेटतील यात तिळमात्र शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT