पश्चिम महाराष्ट्र

#गावमाझंवेगळंः महागावचा चिरमुऱ्यांचा आंतरराज्य ब्रॅंड

गणेश बुरूड

प्रत्येक गाव आपापल्या कुवतीनुसार आपलं एक वेगळंपण जपण्याचा प्रयत्न करीत असतो. महागाव त्यांपैकीच एक. हे गाव चविष्ट जवारी चिरमुऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चिरमुऱ्यांचा आंतरराज्य ब्रॅंडही कधी तयार झाला, हेसुद्धा कळाले नाही. गोवा, कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्राला महागावच्या चिरमुऱ्यांनी वेड लावले आहे. 

महागाव तसे सधन आहे. जवळून हिरण्यकेशी नदी वाहते. चिंचवृक्षांच्या दाटीवाटीतूनही पाण्याने तुडुंब भरलेला परशुराम तलाव लक्ष वेधून घेतो. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्याही नोंद घेण्यासारखी आहे. याच गावात ५० वर्षांपासून रांगोळीची परंपरा जपली जात आहे. विविध वैशिष्ट्यांचे हे गाव चिरमुऱ्यांच्या भट्टीत तावून सुलाखून आपलं वेगळंपण जपत आहे. चिरमुऱ्यांमुळे गावची ओळख सर्वदूर पोचली आहे. महागावचे चिरमुरे पश्‍चिम महाराष्ट्रात लोकप्रिय आहेतच; पण कर्नाटक व गोव्यातूनसुद्धा मोठी मागणी आहे.

महागावमधील गौस सोलापुरे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पहिल्यांदा गावात भट्टी सुरू केली. सोलापुरे यांच्यापासूनच चिरमुऱ्यांचा व्यवसाय गावात वाढला. भट्टीच्या उष्णतेमुळे जाणवणारी कामगारांची टंचाई आणि भाताची कमी उपलब्धता यांमुळे सोलापुरे यांच्या वारसांना मात्र हा व्यवसाय पुढे सुरू ठेवणे शक्‍य झाले नाही. काही वर्षांपर्यंत गावातील भट्ट्यांची संख्या ६० वर होती. दररोज ट्रकभरून चिरमुरे बाहेर जायचे. सध्या भट्ट्यांच्या संख्येत घट झाली असली; तरी चिरमुऱ्यांचा ब्रॅण्ड आणि चव मात्र कायम आहे.

आजही महागावच्या चिरमुऱ्यांना पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमधून मागणी असते. जवारी चिरमुरे तयार करण्यासाठी हावळा जातीचा भात लागतो. गावात या भाताचे उत्पादन मोठे असायचे. कालांतराने उसाखालील क्षेत्र वाढल्याने या भाताचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे कोकण आणि इतर भागातून हावळा भात चिरमुऱ्यांसाठी आणला जातो. चवदार आणि गोलगोल चिरमुरे बनविण्याचे तंत्र अभ्यासण्यासाठी विविध भागांतून व्यावसायिक महागावला भेटी देतात. यातूनच महागावच्या ब्रॅण्डची ओळख अधिक स्पष्ट होते.

अस्तित्वातील भट्ट्या
स्वातंत्र्यपूर्व काळापासून महागावात सुरू असलेला चिरमुऱ्यांचा प्रवास काही वर्षांपर्यंत अखंडित होता. परंतु, दहा-बारा वर्षांपासून चिरमुरे व्यावसायिकांची संख्या घटली आहे. सध्या गावात प्रकाश भोसले, रियाज सय्यद, शिवाजी भोसले, बशीर सय्यद, रजाक हावळे यांच्या चिरमुरे भट्ट्या सुरू आहेत. या व्यावसायिकांच्या माध्यमातून आजही चिरमुऱ्यांचा महागाव ब्रॅण्ड चर्चेत राहिला आहे.  

चिरमुऱ्यांचे अर्थकारण
पाच वर्षांपूर्वी एक मण म्हणजे ६० किलो हावळा जातीच्या भातासाठी एक हजार रुपये दर होता. सध्या एका मणाला १५०० ते १६०० रुपये मोजावे लागतात. तीस वर्षांपूर्वी हाच दर ३०० रुपये होता. सध्या चिरमुऱ्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढलेत. त्या मानाने चिरमुऱ्यांचे दर फारसे वाढलेले नाहीत. केवळ १० ते १२ रुपयांचीच वाढ झाली आहे. सध्या जवारी चिरमुऱ्याचे दर १२० रुपये किलोपर्यंत आहेत. भट्टी तापवण्यासाठीचा कोंडा, रेती, मीठ, भुईमुगाची टरफले यांच्याही किमती वाढलेल्या आहेत. चिरमुरे काढणे ही एक कला आहे. ती ज्याला जमते, त्याचेच चिरमुरे चविष्ट होतात. या ज्वारी चिरमुऱ्याशी कर्नाटकातील मलबारी चिरमुऱ्याने स्पर्धा केली. त्याचा दरही कमी आहे; परंतु महागावच्या चिरमुऱ्यांची जिभेवर रुळलेली चव मलबारी चिरमुरे देऊ शकत नाहीत; यामुळे ग्राहकांची पसंती महागाव चिरमुऱ्यांनाच आहे.

पहाटेचे चिरमुरे चविष्ट
चांगल्या प्रतीच्या चिरमुऱ्यांसाठी भट्टी जास्त तापावी लागते. जेवढी चांगली भट्टी तापेल तेवढे चवीचे चिरमुरे तयार होतात. पहाटे दोननंतर भट्टी तापवली जाते. भट्टी तापल्यानंतर प्रचंड उष्णता असते. दिवसा भट्टी तापवली, की ऊन आणि भट्टीची उष्णता याचा परिणाम कामगारांच्या आरोग्यावर होतो; म्हणूनच पहाटे वेळीच भट्टी तापवली जाते. त्यानंतर सकाळी सातपर्यंत चिरमुरे तयार केले जातात. पहाटे तयार झालेले चिरमुरे दिवसभर विकायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीच पहाटे भट्टी पेटवायची, ही दैनंदिनी चिरमुरे व्यवसायात ठरलेली आहे.

महागावने चविष्ट चिरमुरे तयार करण्यात लौकिक मिळविला आहे. पुण्या-मुंबईचे लोक या चिरमुऱ्यांना पसंती देतात. सध्या कामगारांची टंचाई, कच्च्या मालाचे वाढलेले दर, चिरमुऱ्यांसाठी लागणाऱ्या हावळा भाताचे कमी आलेले उत्पादन यांमुळे हा व्यवसाय चालविणे जिकिरीचे बनले आहे. या सर्वांवर मात करून महागावचा ब्रॅण्ड टिकवण्यासाठी आजही काही व्यावसायिक धडपडत आहेत.
- बशीर सय्यद
, चिरमुरे व्यावसायिक, महागाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT