सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक पद्धतीने झाडांना पाणी देण्यास सुरवात झाली आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाडांना बाटलीद्वारे पाणी देण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली. या वेळी गणेश नाईक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार, शिक्षिका मायादेवी पवार, स्मिता पाटील, विजयालक्ष्मी मेनकुदळे, प्रिया जवळगी, ललिता म्हेत्रे, रूपाली लायने, स्नेहल करंडे, शिक्षक संतोष हिरेमठ, अजिज जमादार, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तुकाराम जाधवर, वनपाल शहाजी देशमुख, वनरक्षक एस. बी. हिरेमठ, कर्मचारी संजय भोईटे आदी उपस्थित होते.
गणेश नाईक प्राथमिक शाळेतील पर्यावरणप्रेमी शिक्षक मदन पोलके यांच्या पुढाकारातून ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरातील टाकावू प्लास्टिकच्या बाटल्या शाळेत संकलित करण्याची सूचना देण्यात आली होती. एक हजाराहून अधिक बाटलीचे संकलन करण्यात आले. हा उपक्रम यापुढेही कायम चालू राहील, असे श्री. पोलके यांनी सांगितले.
काय आहे संकल्पना?
टाकाऊ बाटल्यांचे संकलन करायचे. बाटलीला खालच्या बाजूला छिद्र पाडायचे. त्या छिद्रामध्ये सुतळी घालायची. सुतळीचा अर्धा भाग बाहेरच्या बाजूला ठेवायचा. झाडाच्या बाजूला छोटा खड्डा मारून त्यात सुतळी लावलेली बाटली ठेवायची. त्यानंतर बाटलीत पाणी भरायचे. हे पाणी सुतळीद्वारे झाडाच्या मुळापर्यंत जाते. पाणी मिळाल्याने झाड वाळत नाही. बाटलीतील पाणी संपले की पुन्हा त्यात पाणी भरायचे. अशी ही संकल्पना आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.