माय फ्रेंड श्रीगणेशा सात
---
सुखकर्ता
पीतांबर लोहार
अरे! का थांबलास. हं, फुलांचा हार घ्यायचाय वाटतं. घे चांगला हार घे. मी तुला सांगणारच होतो, माझ्यासाठी फुलांचा एक हार घ्यायला. बरं झालं, तूच घेतो आहेस. मला सुगंधी फुलं खूप आवडतात. जास्वंदीची फुलं तर माझ्या खूप आवडीची आहेत. फुलं ही इतरांना आनंदी ठेवतात. त्यासाठी केवळ माझ्या उत्सव काळातच नव्हे किंवा सण, उत्सव, सभा, समारंभ याच वेळी फुलांचा वापर नाही करायचा, तर प्रत्येक क्षणी सुगंधित फुलांचा वापर करायचा. तुझ्या राहण्याच्या ठिकाणी अर्थात घरात, कामाच्या ठिकाणी फुलांचा किंवा फुलांपासून बनविलेल्या द्रव्याचा वापर करायचा. त्यामुळे परिसर सुगंधित होतो. मन प्रसन्न व आनंदित राहाते. त्यासाठी अत्तर, धुप, अगरबत्ती वापरू शकता. आयुर्वेदानुसार, सुगंध हा माणसाला विषाणू व नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतो. सकारात्मक भावना वाढवतो. मन प्रसन्न ठेवतो. त्यामुळे तूही नेहमी सुगंधी फुलांचा किंवा धूप, अगरबत्ती, अत्तराचा वापर कर. त्यामुळे सकारात्मक भावना वाढीस लागेल. मनावरचा ताण कमी होईल. तू तणावमुक्त राहशील. तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर भगवद्गीता वाच. त्यातील प्रत्येक शब्द तुला नवा मार्ग दाखवेल. सकारात्मकतेचा. समुपदेशन करणारा. तणावमुक्तीकडे नेणारा. प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारा. कारण, भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही. तर एक अनुपम असे शास्त्र आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं. त्यानिमित्त आपल्यापर्यंत पोहोचलेलं. या भगवद्गीतेचं वर्णन श्रीवेदव्यासांनी ‘महाभारत’ ग्रंथात केलं आहे. भगवद्गीतेबाबत व्यास म्हणतात,
गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभास्य मुखपद्माद् विनिःसृता।।
म्हणजेच, गीता हा उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ समजून घ्यायचा ग्रंथ आहे. त्यातील भाव अंतःकरणात साठवून ठेवायचा आहे, हेच मुख्य कर्तव्य आहे. कारण, गीता ही स्वतः पद्मनाभ भगवान श्रीविष्णुंच्या मुखकमलातून प्रकट झाली आहे. तिच्यापुढे इतर शस्त्रांची गरजच नाही. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात भगवद्गीतेचे वर्णन केले आहे. ते म्हणतात,
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥
म्हणजेच जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. कशाच्याही अभिलाषा न ठेवता, स्वार्थ भाव न ठेवता, केवळ भगवंत भक्तीसाठी गीता सांगितली पाहिजे. तिचा प्रसार व प्रचार केला पाहिजे. कारण, त्यातून तुम्हा मानव जातीचेच कल्याण साधले जाणार आहे.
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ।।
यातून भगवान श्रीकृष्ण सांगतात की, माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा व्यक्तीच मला प्रिय आहे. त्याच्याहून अधिक चांगला माणूस कोणीच असू शकत नाही. पृथ्वीवर त्याच्यापेक्षा अधिक प्रिय दुसरा कोणी व्यक्ती मला भविष्यातही भेटणार नाही. तसा व्यक्ती होणारही नाही.
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥
जो व्यक्ती आम्हा दोघांच्या अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील धर्ममय संवादरूपी गीताशास्त्राचे अध्ययन करील, त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन, असे माझे मत आहे. म्हणजेच द्रव्यापेक्षाही ज्ञानयज्ञ महत्त्वाचा आहे. गीतेतील शिकवणीने माणसांचे प्रत्येक परिस्थितीत सुगमतेने कल्याण होऊ शकते, म्हणून गीतेच्या प्रचाराचा विशेष महिमा भगवान श्रीकृष्णांनीच सांगितला आहे. युद्धासारख्या परिस्थितीतही जनकल्याणाचा विचार गीतेने भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला सांगितला आहे. तोच महिमा मी तुला सांगत आहे. फरक इतकाच आहे, अर्जुनाला सांगणारे भगवान श्रीकृष्ण होते आणि तुला सांगणारा मी गणपती आहे. गीता सांगणारी व्यक्ती कोणीही असू दे, कल्याण ऐकणाऱ्यांचंच होणार आहे. तुझेही कल्याण होणारच आहे. कारण, तुला गीता सांगणारा मी अर्थातच गणपती आहे आणि ऐकणारा तू अर्थात माझा भक्त आहेस. भक्तांचे कल्याण हेच माझे साध्य आणि साधन आहे. तेव्हा लक्षात ठेव, जीवनाचे कल्याण म्हणजे श्रीमद्भगवद्गीता आहे. जीवनाचा सुगंध म्हणजे श्रीमद्भगवद्गीता आहे. हा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे, म्हणून सुगंधित फुलांचा एक पुष्पहार माझ्यासाठी घेण्यास तुला
सांगायचे होते. पण, तू स्वतःहूनच हार घेतलास. यातच माझं समाधान आहे. तुझं कल्याण होईल, हेच माझं म्हणणं आहे. कोणत्याही अडचणीच्या काळात मी तुझ्या पाठीशी असेन, हे विसरू नकोस. आजपासून तणावमुक्त जीवन जगायचं. जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा तेव्हा केवळ माझं नामस्मरण कर, मी तुझ्या हाकेला सदैव धावून येईल. विघ्नहर्ता गणपती. सुखकर्ता गणपती. बाप्पा मोरया गणपती.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.