पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेला हल्ला हे काहीतरी कटकारस्थान आहे. पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना इजा करण्याचा आंदोलकांचा हेतू होता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचा आणि एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘कामगार संघटनांची आंदोलने होतात. परंतु शुक्रवारी झालेल्या आंदोलकांचा हेतू हा शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना इजा करण्याचा होता. ज्या प्रकारे आंदोलक हे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी वितंडवाद घालत होते, त्यावरून हे दिसून येते. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण एसटी कामगारांची दिशाभूल केली जात आहे.’’
पोलिसांनी वेळीच अटकाव केला असता तर हा प्रकार घडला नसता. गेल्या काही दिवसांतील आंदोलकांची भाषा पाहता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे होते. त्यांना एखाद्या मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय आंदोलकांचे इतके धाडस होऊ शकत नाही. ज्या प्रकारे आंदोलक घुसले, त्यावेळी दोन पोलिसही नसते तर त्यांनी नक्कीच पवार आणि सुळे यांना इजा पोचवली असती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचा आणि एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
सुप्रिया सुळे आंदोलकांशी ज्या प्रकारे सामोरे गेल्या, त्या परिस्थितीतही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, हे कौतुकास्पद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी त्यांच्यासाठी रणरागिणी शब्द वापरला असता. यापुढील काळात पवार आणि सुळे यांची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांना या हल्ल्याबाबत कल्पना असायला हवी होती. चौकशीतून काय निष्पन्न होते, त्यावर लगेचच गृहमंत्रालय किंवा पोलिसांवर अपयशाचा शिक्का मारून त्यांचे नीतिधैर्य खच्चीकरण करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेस माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेविका संगीता ठोसर, गजानन थरकुडे उपस्थित होते.
गृहखाते कमी पडले
‘‘शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. महात्मा गांधीसारखा प्रकार शरद पवार यांच्यासोबत घडला असता. राज्याचे गृहखाते कमी पडले. गुप्तचर विभाग झोपा काढत होते का,’’ असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी या वेळी उपस्थित केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.