तळेगाव स्टेशन (पुणे)- मोजक्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलेली चाकणची जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे, समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी काही जाणकार स्थानिकांना जमवून गावातून फेरी काढल्यानंतर स्थानिकांचा प्रभाव वाढल्याने जाळपोळ शमली. त्यानंतर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्वास नांगरे पाटील यांनी तरुणांना भावनिक आवाहन केल्यावर संध्याकाळपर्यंत तणाव हळूहळू निवळत गेला.
मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता.30) खेडसह चाकण बंद पुकारण्यात आला होता. प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने पुणे-नाशिक महामार्गावर अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. सकाळी अकराच्या सुमारास स्थानिक सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय आंदोलन आणि मोर्चा शांततेत पार पडला. त्यानंतर काही मंडळींनी प्रक्षोभक भाषण करून लोकांना चिथवण्याचे काम केले आणि तळेगाव चौकात जमलेला हजारोंच्या जमवाने अचानक दगडफेक सुरु केली. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. काही वेळानंतर पोलीस आले असता, त्यांच्यावर आणि पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक सुरुवात केली. जमावापुढे निभाव लागू न शकल्याने पोलिसांनी देखील काढता पाय घेतला. कोणालाही मोबाईल किंवा कॅमेरा बाहेर काढू दिला जात नव्हता.
तळेगाव चौकातील वाहतूक पोलीस चौकी उध्वस्त करुन, शिक्रापूर रस्त्यावरील बसस्थानकात बस आणि एक जीप जाळल्यानंतर जमावाने आपला मोर्चा माणिक चौक मार्गे चाकण पोलीस ठाण्याकडे वळविला. पोलीस ठाण्यासमोरील वाहने पेटविल्यानंतर जमाव पोलीस ठाण्यावर चालून येत असताना तिकडे उभ्या स्थानिकांनी सदर लोक चाकणमधील स्थानिक नसल्याचा निर्वाळा पोलिसांना दिला. जादा कुमक म्हणून मागविलेल्या बंदोबस्तावर साध्या वेशात असलेले तळेगाव दाभाडेचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तत्परतेने चक्रे फिरवत आणखी काही स्थानिक मंडळींना तिकडे बोलावून घेत, बाहेरील आंदोलनकर्त्यांना हुसकवायला सुरुवात केली.
स्थानिकांसह मोठ्या संख्येने आवाहन करीत गावातून फेरी काढल्यानंतर, तोडफोड करणारे परागंदा झाले आणि जाळपोळ बऱ्यापैकी शमली. साडेचारच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्वास नांगरे पाटील चाकणमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना एकत्र जमवत भावनिक आवाहन केले.
"मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुमच्यामध्ये शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्या तोंडाशी आलेला घास आपल्याला जाऊ द्यायचा नाही. मला तुमचा भाऊ समजा. आपल्याला शांततेने घ्यायचे आहे. चाकण हे औद्योगिकदृष्ट्या सुधारलेले शहर आहे. येत्या काळात आपल्याला खूप चांगले काहीतरी मिळणार आहे." असे आवाहन डॉ.विश्वास नांगरे पाटील यांनी करताच जमाव शांत झाला.
सायंकाळी जमावबंदी लागू केल्यानंतर धुमसते चाकण थंड होऊन अंधारात विसावले. पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्वास नांगरे पाटील यांचे भावनिक आवाहन, चाकणला काही काळ निरीक्षक पदावर राहिलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी वापरलेली गावकऱ्यांची जुनी ओळख आणि दोघा अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकणच्या जाणकार मंडळींनी शमविलेले प्रक्षुब्ध आंदोलन "गाव करील ते राव काय करील?" या म्हणीची प्रत्यक्ष परिचिती देणारे ठरले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.