बारामती – महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून कनेक्शन तात्पुरते बंद केले जाते. पुढील तीन महिन्यातही जर थकबाकीचा भरणा केला नाही तर मात्र कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जाते. जोपर्यंत त्या बंद कनेक्शनची थकबाकी व्याज व दंडासहित भरली जात नाही तोवर त्या जागेवर नवीन कनेक्शन दिले जात नाही.
बारामती परिमंडलात अशा प्रकारच्या 5 हजारांहून अधिक प्रकरणांची पडताळणी झाली. ज्या ठिकाणी थकबाकीचा भरणा झाला त्यांना वगळून तब्बल 329 प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यात त्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी 37 लाख 95 हजारांचा दंड वसूल होणे अपेक्षित आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. बारामती परिमंडलात मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी धडक कारवाई केली.
त्यातून सातारा जिल्ह्यात 1 तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल 273 तसेच बारामती मंडलात 55 असे एकूण 329 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईने परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.