पुणे : "छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला लाल महालातील हल्ला हा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. अफजल खानाच्या वधाच्या वेळीदेखील शिवरायांनी हेच तत्त्व वापरले होते. सैन्यदलात आज शिकविली जाणारी अनेक तत्त्वे छत्रपतींनी 400 वर्षांपूर्वी अमलात आणली होती. शिवरायांनी सैन्यदलाला लढण्याची दिव्यदृष्टी दिली,'' असे मत निवृत्त कर्नल अरविंद जोगळेकर यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) मुंबई, इतिहासप्रेमी मंडळ आणि पुणे मराठी ग्रंथालय अभ्यासिका विभागातर्फे पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव पुरस्कार प्रतापराव टिपरे यांना प्रदान करण्यात आला, या वेळी जोगळेकर बोलत होते. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाल्याबद्दल पुरंदरे यांचा सन्मान त्यांच्या सून चित्रलेखा पुरंदरे यांनी स्वीकारला. तसेच, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश वैद्य, शिवाजी ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ. हेमंतराजे गायकवाड, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्र. के. घाणेकर, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, श्रीनिवास वीरकर, मनोहर ओक आदी उपस्थित होते.
जोगळेकर म्हणाले, "सियाचीनमध्ये वर आकाश आणि खाली बर्फ असतो. त्या वेळी वाचन हाच सैनिकांचा साथी असतो.'' शेटे म्हणाले, ""स्वराज्यासाठी किंवा देशासाठी जसे मरणे ही मोठी गोष्ट आहे, तसेच लढत राहून झुंजणेदेखील महत्त्वाचे असते. मोरोपंत पिंगळे यांचे कार्यदेखील असेच होते, त्यामुळे त्यांच्या नावाने आजच्या काळात असे कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते.'' प्र. के. घाणेकर, प्रतापराव टिपरे यांनी मनोगत व्यक्त केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.