पिंपरी - पावसाळा सुरू झाल्यापासून रोज खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजकांचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कैफियत मांडण्याचा निर्णय शहरातील लघुउद्योजकांनी घेतल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
शहरातील एमआयडीसी परिसरात पावसाळ्याला सुरवात झाल्यापासून आजपर्यंत रोज चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित असतो. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर होत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या. मात्र, आजतागायत हा प्रश्न सुटू शकला नसल्याचे बेलसरे म्हणाले.
पावसाळ्यापूर्वी महावितरणने देखभाल दुरुस्तीचे काम मार्गी लावणे अपेक्षित होते. एप्रिलपासून पावसाळ्याला सुरवात होईपर्यंत याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर चार वेळा बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये अनेक ठिकाणी असणारे वायरिंगच्या अडचणी, वाढलेल्या झाडाच्या फांद्या याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र, आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करत महावितरणकडून ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. लघुउद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला, त्या वेळी १५ दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. मात्र, तो सुरू झाला नाही, असे बेलसरे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.