दौंड, ता. ३० : दौंड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकसान प्रकरणी तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष तथा दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे.
दौंड शहरात पत्रकार परिषदेत राहुल कुल यांनी ही माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार, पोलिस उप अधीक्षक बापूराव दडस, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया या वेळी उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले, दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे, दुकाने, फळबागा, रस्त्यांचे नुकसान झालेले आहे. दौंड शहरात पावसामुळे जीर्ण झालेली भिंत पत्र्यावर पडून त्याखाली दबून श्रीमती तारादेवी अहीर यांचे निधन झालेले आहे.
ते पुढे म्हणाले, तालुक्यातील हातवळण व गार येथील पोल्ट्री शेडचे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. रावणगाव येथे शेती, घरे व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. खडकी येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. स्वामी चिंचोली येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतांमध्ये पाणी असल्याने पंचनामे करण्यात अडचणी आहेत परंतु पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसानभरपाई बाबत मागणी केली असून समक्ष पाहणी नंतर सविस्तर मागणी करणार आहे.
पायाभूत व्यवस्थांना फटका
तालुक्यात ज्या ठिकाणी रस्ते वाहून गेले व ज्या ठिकाणी पायाभूत व्यवस्थांचे नुकसान झाले आहे तेथील नुकसान प्रकरणी पंचनामे केले जात आहेत. या कामांचे अंदाजपत्रक तयार करून ही कामे लवकर सुरू करण्याकरिता नियोजन करीत आहोत, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.