माळेगाव, ता. १९ : ‘‘भाजप-शिवसेना हे पक्ष लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करतात. साखर उद्योगाला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी घेतलेले इथेनॉलसारखे निर्णय असो, महिलांना सवलतीच्या दरात बस सेवा असो, भूविकास बॅंकेचे ९६४ कोटी कर्ज माफी असो, अशा अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांसह लोकांचा प्रतिसाद सरकारला वाढतो आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा दिसले. उद्धव ठाकरे, पवारसाहेब आणि कॉंग्रेसवाल्यांनो, हिंमत असले तर स्वतंत्र लढा, तुम्ही किती पाण्यात आहेत, हे तुम्हालाच कळेल,’’ अशा शब्दात माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते विजय शिवतरे यांनी महाविकास आघाडींच्या नेतेमंडळींना आव्हान दिले.
शारदानगर (ता. बारामती) येथे पत्रकारांच्या कट्ट्यांवर शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, ‘‘बारामतीचे वैभव हे पूर्व-पश्चिम भागापुरते मर्यादित आहे. बारामतीमध्ये जिरायती भागाचा पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तो प्रश्न मी शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून सोडविणार आहे. बारामतीत जे काही अधिकचे चांगले झाले आहे, ते अजितदादांनी कष्टांनी केले, हे मी नाकारत नाही. त्यांच्या कामाचा मी प्रशंसक आहे. परंतु, पाण्यासारखे अनेक असे प्रश्न या तालुक्यात आहेत, ते सोडविण्यासाठी आणि येथील प्रस्थापितांच्या विरुद्ध असलेल्या युवकांना एकत्र करून शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न माझा आहे.’’
नीरा देवघर धरणातील अतिरिक्त पाणी फलटण, माळशिरस आदी भागात वळविण्याचा भाजप नेतेमंडळींचा पुन्हा प्रयत्न सुरू आहे, असे विचारले असता शिवतरे म्हणाले, ‘‘नीरा देवघर धरण, गुंजवणीतील पाणी असो, ज्यांच्या वाट्याचे आणि हक्काचे पाणी आहे, त्यांना मिळण्याची स्थिती निर्माण झाली, म्हणून आपल्याला दुःख वाटायचे कारण नाही. परंतु, या कमी होणाऱ्या पाण्यावर मार्ग काढण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली, शेततळी आणि गळतीचे प्रमाण कमी केल्यास निश्चितपणे पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीला पुरसे पाणी उपलब्ध होईल.’’
यावेळी शेतकरी अविनाश देवकाते यांनी उपस्थित केलेल्या नीरा नदीमधील प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे शिवतरे यांनी सांगितले. तसेच आरोग्याविषयी नविन योजना गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभा करावी, अशी मागणी रुग्णमित्र अविनाश गोफणे यांनी केली.
लोकसभेच्या उमेदवारीवर मौन
‘‘केंद्र व राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत नेणार आणि जनतेमध्ये शिवसेनेची ताकद वाढविणार आहे. त्यामुळे लोकसभेचा कोण उमेदवार आहे, हे न पाहता मी पक्ष वाढीचे काम करणार आहे. लोकसभा उमेदवार हे पक्षश्रेष्ठी ठरविणार आहेत,’’ असे सांगून शिवतरे यांनी आपल्या उमेदवारीबाबत मौन बाळगले.
सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडून बारामतीत कामगारांसाठी अद्ययावत रुग्णालय मिळविले आहे. वास्तविक हे शासनस्तरावरील रुग्णालय दिवे घाट परिसरात झाल्यास सर्वांना फायदा होईल. परंतु, त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील इतर तालुक्याचा विचार केला नाही, याचे दुःख वाटते.
- विजय शिवतारे, माजी मंत्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.