‘‘सध्या माणसे भुलवून, त्यांची दिशाभूल करून कोरेगाव तालुक्याचे राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचा सुरू असलेला प्रयत्न योग्य नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे तुम्ही जावळीच्या नादी न लागता कोरेगावमधूनच लढावे.’’
पळशी (सातारा) : राजकारण हा सध्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने ढासळलेल्या राजकीय संस्कृतीची पुन:स्थापना करण्यासाठी आणि २०१९ मध्ये जे बिघडले आहे, ते सुधारण्यासाठी वैचारिक मतांची एकजूट करावी लागणार आहे. सूडाच्या राजकारणातून कार्यकर्त्यांची जिरवण्याच्या संस्कृतीला थांबवण्याची जबाबदारी आता मतदारांवर आहे, असं स्पष्ट रामराजेंनी व्यक्त केलं.
कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत (Koregaon Market Committee Election) महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असं आवाहनही विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं.
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगाव येथे आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब सोळसकर, अॅड. विजयराव कणसे, शिवाजीराव महाडिक, सुनील माने, किशोर बाचल, संजय झंवर, रामभाऊ लेंभे, राजेंद्र शेलार, राजाभाऊ जगदाळे, अरुण माने, श्रीमंत नि. झांजुर्णे, राजेंद्र भोसले, संजना जगदाळे, श्रीमंत स. झांजुर्णे, भास्कर कदम, अॅड. श्रीकांत चव्हाण, प्रताप कुमुकले, अजय कदम, नाना भिलारे, राहुल साबळे आदींसह पॅनेलचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
वैयक्तिक द्वेष किती करायचा? असा प्रश्न उपस्थित करून रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) म्हणाले, ‘‘कोरेगावची एक वैचारिक पातळी, राजकीय संस्कृती आहे. हे वैभव तुम्ही गमावून बसलेले आहात. विकले जाणारे राजकारण नको आहे. त्यामुळे मतदार म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. अन्यथा या जिल्ह्याचे बिघडलेले वळण कधीही सरळ होणार नाही.’’
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘कोरेगाव मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार दिले आहेत. अॅड. विजयराव कणसे व मी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो आहे; पण आम्ही कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र, प्रतिमुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. छोट्या -छोट्या गोष्टींवरून लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. काल तर त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांना धमकी दिली. आपली एकत्रित ताकद विरोधकांना नेस्तनाबूत करेल, असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देऊयात. कणसेसाहेब मी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने कोरेगावातूनच लढाई करणार आहे.’’
अॅड. कणसे म्हणाले, ‘‘सध्या माणसे भुलवून, त्यांची दिशाभूल करून कोरेगाव तालुक्याचे राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचा सुरू असलेला प्रयत्न योग्य नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे तुम्ही जावळीच्या नादी न लागता कोरेगावमधूनच लढावे.’’ सुनील माने, राजेंद्र शेलार, बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक यांचीही भाषणे झाली. दरम्यान, केतन चव्हाण, समीर वीर यांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे राहिले आहेत; परंतु या दोघांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर या दोघांचाही सत्कार रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाला.
‘‘जिल्हा बँकेच्या पदाचा गैरवापर करून कोणी सोसायटी मतदारसंघातील मतदानामध्ये ढवळाढवळ करू नये. माझे डोके जोवर सरळ आहे, तोवर सरळ. अन्यथा...,’’ अशा शब्दांत रामराजे नाईक- निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत कोणाचे नाव न घेता इशारा दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.