जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात बॅंक घोटाळ्यात तब्बल 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्र डबघाईला आले आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, श्रीधर पाटील, सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते. श्री. तिवारी म्हणाले, की नोटांबदीनंतर देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही. सद्या देशाचा जीडीपी घसरला आहे. अशा अवस्थेत पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होणे शक्यच नाही.
पाणी करार रद्दमुळे नुकसान
नार, पार, दमण, गंगा पाणी कराराबाबत ते म्हणाले, राज्यात कॉंग्रेसचे आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारसोबत या नद्यांच्या पाण्याबाबत करार केला होता. मात्र राज्यात आलेल्या भाजप सरकारने केंद्र सरकारच्या दबावाला बळी पडून तो करार रद्द केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला जात असून खानदेशचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवसेना नेते खरे बोलणारे
राज्यातील राजकीय स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षापेक्षा शिवसेना चांगली आहे. शिवसेना आक्रमक असली तरी त्यांचे नेते भावनाप्रधान आहेत. आणि ते खरे बोलणारे आहेत. शिवसेनेने महात्मा गांधी, पंडित नेहरू, तसेच कॉंग्रेसचे महत्त्व स्पष्टपणे वेळोवेळी पटवून दिलेले आहे. राज्यातील परिस्थिती बघता सत्तेत पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.