इंदिरानगर : मानवाने आज बुद्धीच्या जोरावर प्रत्येक बाबतीत मोठी प्रगती केली आहे. नवी नवी क्षितिजे पार करीत असताना तो सुखी व तणावमुक्त नाही हे वास्तव असून, सुख मिळविण्यासाठी बुद्धीला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे, असे मत मेंदू व मज्जारज्जू शल्य विशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी येथे व्यक्त केले. क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प "अध्यात्म आणि आरोग्य' या विषयावर त्यांनी गुंफले. डॉ. करंदीकर म्हणाले, की मनाचा ठाव अतिप्रगत विज्ञानालाही घेता आलेला नाही. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आणि स्वास्थ्याचा शोध घेण्यासाठी अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची गरज आहे. यातील भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, नामस्मरण, गीतासार, कर्मयोग आणि प्रेमयोगाचा अभ्यास आणि साधना केली, तर जीवन सुखी, समृद्धी आणि संतुलीत म्हणजेच खऱ्या अर्थाने आरोग्यदायी होईल, हे ध्यानात घेतले पाहिजे. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र करंबळेकर, प्रवीण जोशी, रवी बालाटे, अरुण रोडे, रमेश नागरे, अशोक धर्माधिकारी आदी उपस्थित होते. |