भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हटला जात असे; परंतु आता ते सर्वच मागे पडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणूक काळात जिल्हा भाजपमध्ये दिसून आलेले बेशिस्तीचे दर्शन राज्यातील जनतेच्या स्मरणात आहे. मात्र, या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई करणार, याबाबत मात्र आता कार्यकर्तेच नाही, तर जनतेच्या मनातही प्रश्न आहे.
लोकसभेची 2019 निवडणूक जळगाव भाजपसाठी कायमची आठवणीत राहणारी असेल. ती उमेदवाराच्या निकालावरून नाही, तर पक्षातील अंतर्गत वादातून. निवडणूक जाहीर झाल्यापासून पक्षात वादाला सुरवात झाली, ती थेट उमेदवाराच्या प्रचारातही कायम राहिली. निवडणूक जाहीर होताच एक वादग्रस्त चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले. खासदार ए. टी. पाटील यांच्या उमेदवारीवर गदा येण्याचे चित्र दिसू लागले. मात्र, त्यावेळी खासदार पाटील गप्प बसले; परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी मात्र खासदार पाटील यांनी थेट आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत थेट भाजपच्या नेतृत्वासह पदाधिकाऱ्यांवरही जोरदार आरोप केले. ए. टी. पाटील यांच्या कापलेल्या उमेदवारीचा वाद सुरूच असताना, पक्षाने अधिकृत जाहीर केलेल्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षांतर्गत वादाचा आणखी मोठा भडका उडाला. जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांच्या समर्थकांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनीही "पक्षाने आमचा कोल्ड ब्लडेड मर्डर' केल्याचा आरोप केला. अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे आता पक्षांतर्गत वाद शमला जाईल, असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटत असतानाच अमळनेर येथे पक्षाच्या मेळाव्यात व्यासपीठावर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात हाणामारी झाली. विशेष म्हणजे या मेळाव्यास व्यासपीठावर जलसंपदामंत्री भाजप नेते गिरीश महाजन हजर होते. या हाणामारीचे "लाइव्ह' दर्शन राज्यातील जनतेने बघितले. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात खासदार ए. टी. पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपपासून तर थेट अमळनेर येथील हाणामारीपर्यंतच्या प्रकरणाबाबत पक्षांतर्गत चौकशीची होणार काय? याबाबत आता पक्षकार्यकर्त्यांतच चर्चा सुरू झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत पक्षाच्या वरिष्ठस्तरीय समितीतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, चौकशी कशी होणार? याबाबत मात्र त्यांनीच खुलासा केलेला नाही. जळगाव लोकसभेचा निकाल जनता देईलच. मात्र, पक्षातील बेशिस्तीबाबत काय? हा प्रश्नच आहे. जर जळगावच्या जागेवर पक्षाचा विजय झाला, तर हे सर्व वाद हवेत विरून जाणार; परंतु पराभव झाला तर मात्र कारवाई होणार, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये झालेले वाद आता प्रश्नचिन्हांकित आहेत. लोकसभा निवडणूक पार पडली असली, तर लगेच सहा महिन्यांनी विधानसभा आहेच. त्यामुळे पक्षनेतृत्वाने या प्रकाराकडे कानाडोळा केल्यास विधानसभेत मात्र पक्षांतर्गत मोठा "आखाडा' होण्याचे चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.