Nashik Crime News : मुकणे- दारणा नदीपात्रात घातक पिवळ्या रंगाचे रसायन सोडून जलप्रदूषणासह मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
जनावरांसह मानवी आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या गोंदे-वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीतील एका बड्या कंपनीतील टाकावू विषारी रसायनाची विल्हेवाट लावताना शेतकऱ्यांनी पकडलेल्या टँकर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Disposal of hazardous chemicals in river basin Crime against tanker driver instead of company Nashik Crime News)
पाटबंधारे विभागासह शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर तिसऱ्या दिवशी वाडीवऱ्हे पोलीसांनी ही कारवाई केली. सदर टॅंकर पोलीसांनी जप्त केला असून, टॅंकर मालक पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते.
आठ दिवसांपूर्वीच नदीपात्रात केमिकलयुक्त द्रव्य सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठची झाडे-झुडपे उभी वाळून गेली असून, नदीजवळून गेले तरी उग्र वास येतो आहे. संपूर्ण नदीचे पाणी दूषित झाले आहे.
याच नदीवरील पाणी पिल्याने अनेक जनावरे दगावली असल्याचेही पशुपालकांनी सांगितले आहे. येथून काही अंतरावरच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वसाहतीत याच नदीतून पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे मानवी आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासन कसूर करत असल्याचे बोलले जात असून, राजकीय वरदहस्त असलेल्या संबंधीत कंपनीवर पोलिसांच्या कारवाईबद्दल शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.
यापूर्वीही अनेकदा नाशिक-मुंबई महामार्गाजवळील वाडीवऱ्हे, गोंदे परिसरातील नाल्यांमध्ये विशेषतः पावसाळ्यात घातक रसायने टँकरद्वारे सोडून देण्यात आले होते. रात्री-अपरात्री लष्करी हद्दीतील मोकळ्या जागेवर रसायनाचे टँकर खाली करण्यात आल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत.
या ठिकाणी अनेक मोकाट जनावरे मृत्युमुखी पडल्याचे कामगार, तसेच येथील नागरिकांनी सांगितले. तर मुकणे धरणाचे पाणी नाशिक महापालिकेला देखील पुरविले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अनेक वर्षांपासून हे जीवघेणे रसायन नदीपात्रात, नाल्यामध्ये सर्रासपणे सोडले जाते. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र याबाबत कुठलीच कारवाई का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाडीवऱ्हे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धारणकर तपास करीत आहेत.
पोलिसांची गस्त हवी
गोंदे-वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांतील उत्पादनाच्या प्रक्रियेमधून टाकावू केमिकल बाहेर पडते. अशा घातक स्वरूपाच्या केमिकलची शक्यतो रात्री-अपरात्रीच विल्हेवाट लावली जाते.
प्रामुख्याने नाले, लष्करी हद्दीतील मोकळी जागा किंवा धरण वा नदीपात्र अशा ठिकाणी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्यास हे प्रकार रोखले जावू शकतात, असे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.