SAKAL - 2021-03-22T104230.354.jpg
SAKAL - 2021-03-22T104230.354.jpg 
नाशिक

कोरोना निर्बंधाची वर्षापूर्ती : नाशिकमधील ऑक्सिजन उत्पादनात पाच पटीने वाढ 

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तसे सप्टेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्या वेळी दिवसाला २२ टन ऑक्सिजनचा पुरवठा शहर आणि जिल्ह्याला व्हायचा. त्याचवेळी जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यासाठी २८ टन ऑक्सिजनची गरज होती. प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यात पाच ते आठ टन ऑक्सिजनचे उत्पादन व्हायचे आणि १८ टन ऑक्सिजन बाहेरून यायचा. रिफिलिंग आणि ऑक्सिजन लिक्विड वाहतूक करणाऱ्या टँकरची अनुपलब्धता या प्रश्‍नांमुळे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या प्रश्‍नाने डोके वर काढले होते. त्यावर उपाय म्हणून मुंबई, रायगडमधून अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या जोडीला दिवसाला ५० टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, असा निर्णय अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑक्सिजन उत्पादकांच्या बैठकीत घेण्यात आला. पुढचे पाऊल म्हणून औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले. 


शहर आणि जिल्ह्यात त्या वेळी नेमके काय घडले होते?

शहर आणि जिल्ह्यात त्या वेळी नेमके काय घडले होते? याचा धांडोळा घेणे आवश्‍यक आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज दहा पटीने वाढली होती. त्याचवेळी लिक्विड ऑक्सिजनची उपलब्धता पन्नास टक्क्यांनी कमी झाली होती. अशावेळी प्रशासनाने लिक्विड ऑक्सिजन मिळविण्यासोबत ऑक्सिजन उत्पादनावर भर देण्यावर लक्ष केंद्रित केले. ऑक्सिजन उत्पादनासाठी परवाने तत्काळ देण्याची भूमिका स्वीकारली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादकांची संख्या सहा वरून नऊपर्यंत पोचली आहे. त्याचवेळी आता ऑक्सिजनचे उत्पादन सप्टेंबर २०२० च्या तुलनेत पाच पटीने वाढून दिवसाला ११७ टनांपर्यंत पोचले आहे. जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ११७ टन ऑक्सिजनचा दिवसाला पुरवठा होत असून, सिलिंडरच्या माध्यमातून दिवसाला पुरवठादारांनी ४८ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. म्हणजेच काय, तर एकीकडे उत्पादन वाढत असताना दुसरीकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज नाशिकमधून भागत ऑक्सिजन शिल्लक राहत असल्याचे चित्र तयार झाले आहे. 

ऑक्सिजनच्या वाहतुकीची व्यवस्था अपुरी

नाशिकप्रमाणेच ऑक्सिजनचा राज्यभर तुटवडा भासू लागल्यावर आरोग्य विभागाने आढावा घेतला होता. त्यामध्ये सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात एक हजार टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून, कोरोना सेंटरला ५०० टन, तर इतर रुग्णालयांसाठी ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊन दिवसाला २०० टन ऑक्सिजन अतिरिक्त राहत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आरोग्य विभागाच्या आढाव्यात ऑक्सिजनच्या वाहतुकीची व्यवस्था अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आल्यावर टँकरच्या उपलब्धतेचे धोरण स्वीकारले गेले होते. दरम्यान, नाशिक महापालिकेने नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात आणि डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या उभारल्या आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयातदेखील ऑक्सिजनची टाकी उभारली आहे. जिल्हा रुग्णालयाची ही व्यवस्था वीस किलोलिटरची असल्याचे 
डॉक्टरांनी सांगितले. 

ऑक्सिजनच्या पुरवठ्यात दीड पटीने वाढ

अमोल जाधव यांच्या ऑक्सिजन उत्पादक कंपनीतर्फे सप्टेंबर २०२० मध्ये दिवसाला २५० लिटर क्षमतेचे ५० टँक आणि २०० सिलिंडरभर ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. आता श्री. जाधव हे ३२५ सिलिंडर आणि ६८ टाक्या भरून ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्याकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्यात दीड पटीने वाढ झाली आहे. तसेच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रुग्णांसाठी ऑक्सिजनची स्वतःची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली. 


व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या वाढीचे आव्हान 
शहर आणि जिल्ह्यातील सप्टेंबरच्या २०२० च्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत आता व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीचे आव्हान उभे ठाकले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सप्टेंबर २०२० च्या तुलनेत आता २६ टनाने ऑक्सिजनचा खप वाढला आहे. मुळातच सप्टेंबर २०२० च्या तुलनेत आता कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढले आहे. तरीही ऑक्सिजनची गरज का भासते? हा खरा प्रश्‍न आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांशी संवाद साधल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली. कोरोनाची लक्षणे न आढळल्याने रुग्ण घरी राहतात. वैद्यकीयदृष्ट्या काळजी घेत नाहीत. मग पाच दिवसांनी प्रकृती गंभीर झाली, की उपचारासाठी धावाधाव होते आणि व्हेंटिलेटर लावण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याची पुष्टी व्हेंटिलेटरवरील रुग्णांच्या वाढलेल्या प्रमाणावरून मिळते. सप्टेंबर २०२० मध्ये व्हेंटिलेटरची आवश्‍यकता १.३२, तर आता १.४१ टक्के रुग्णांना भासते आहे. आरोग्य विभागच्या जिल्हानिहाय बांधण्यात आलेल्या अंदाजानुसार या महिन्याच्या मध्याला आठवड्याला नाशिक जिल्ह्यात ५.०३ टक्के रुग्णवाढ, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.५५ टक्के व मृत्युदर १.५५ टक्के असा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीची शहर आणि जिल्ह्याच्या उपलब्ध माहितीच्या आधारे या महिन्यातील पॉझिटिव्हिटी रुग्णांचे प्रमाण ३०.७९ टक्के असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण आतापर्यंतचे ९०.५८ टक्के आणि या महिन्याचे ५० टक्क्यांहून अधिक, तर मृत्यूचे प्रमाण ०.५ टक्के आहे. आतापर्यंतच्या मृत्यूचे प्रमाण १.६ टक्के इतके आहे. म्हणजेच काय, तर आरोग्य यंत्रणेपुढे कोरोनामुक्तीचे प्रमाण आणखी चार टक्क्यांनी वाढवून मृत्यूचे प्रमाण घटविण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे दिसते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT