नामपूर : चिऊताईच्या गोष्टी ऐकून प्रत्येकाचे बालपण समृद्ध झाले आहे. परंतु, गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, गारपीट, रोगट हवामान, कानाकोपऱ्यात पोहोचलेले मोबाईलचे जाळे आदी बाबींमुळे चिमण्यांचा किलबिलाट नाहीसा होत चालला आहे.
चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. त्यामुळे चिमणी संवर्धन काळाची गरज आहे. ‘Sparrows: Give them a tweet-chance!, I Love Sparrows and We Love Sparrows’ ही यंदाच्या जागतिक चिमणी दिनाची थीम आहे. (World Sparrow Day 2024 marathi news)
चिमणी हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असल्याने चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी २० मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. चिमण्यांची कमी होत असलेली संख्या पर्यावरणीय समतोलासाठी धोकादायक आहे. हेच लक्षात घेऊन नेचर फॉरेव्हर सोसायटीकडून जागतिक चिमणी दिनाची सुरुवात करण्यात आली. चिमण्यांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या पक्षीमित्रांचा संस्थेतर्फे जागतिक चिमणीदिनी सत्कारही करण्यात येतो.
चिमणी अभ्यासकांच्या मते गेल्या काही वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. चिमणी हा सामान्यपणे मानवी वस्तीत राहणारा पक्षी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत असल्याने जागोजागी सिमेंटचे जंगले उभी राहिली.
मोठ-मोठ्या इमारती आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. वृक्षांची कत्तर करण्यात आल्यामुळे आणि सिमेंटच्या मजबूत इमारती उभारण्यात आल्याने चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. . (latest marathi news)
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असून जग ५ जीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे अनेक पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या यादीत चिमणीचा देखील समावेश होतो. रेडिएशनमुळे चिमणीचा केवळ मृत्यूच होत नाही तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील गंभीर परिणाम होतो. त्यामुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
चिमण्यांची घटत्या संख्येचे गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर पहायला मिळत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चिमण्यांचे मुख्य खाद्य अळ्या आणि छोटे-छोटे किटक असतात.
पूर्वी चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. चिमण्या पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे फस्त करत असत. मात्र, आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे. परिणामी, उत्पादनातही घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
"सध्या चांगल्या पिकांसाठी विविध किटक नाशकांचा वापर करावा लागत आहे. ही किटकनाशके शरीरासाठी हानीकारक असतात. परंतु, चिमण्या नैसर्गिक पद्धतीने पिकांचे संरक्षण करतात. त्यामुळे चिमण्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाने पुढाकार घेवून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात." - सचिन कंकरेज, पक्षीमित्र, नामपूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.