नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्यात दोन, तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
अंजनगावसुर्जी (अमरावती) तालुक्यातील गावंडगाव परिसरातील कुरतखेड येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात गुरुवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायक बबनराव बारब्दे (वय 50) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक अविवाहित मुलानेसुद्धा आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते, अशी माहिती आहे.
विनायक यांच्याकडे गावंडगाव शेतशिवारात चार एकर शेती आहे. या वर्षी त्यांनी पूर्ण शेतात कपाशीचे पीक पेरले होते. परंतु, परतीच्या अतिपावसाने पिकांची अवस्था काही चांगली राहिली नाही. त्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिंपळविहीर येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सततची नापिकी, अवकाळी पावसाच्या नुकसानाने व बॅंकेच्या कर्जापायी पिंपळविहीर येथील पुंडलिक श्रावणजी भोंबे (वय 48) यांनी बुधवारी (ता. 20) आपल्या शेतात कीटकनाशक फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
पुंडलिक भोंबे आपल्या शेतात विष घेऊन घरी परतले. पत्नी स्वयंपाक करत असताना "माझी प्रकृती ठीक नाहीं' असे सांगून पाणी मागितले. तेव्हाच तोंडातून फेस गळत असताना पत्नीला शंका आली. त्यांनी तत्काळ त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, मार्गातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
नेर (यवतमाळ) तालुक्यातील अजंती येथील ग्यानू सदाशिव राठोड (वय 40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 20) दुपारी दोनच्या सुमारास झाली. अजंती येथील राठोड कुटुंबात सात एकर सामाईक शेती आहे. ग्यानू व जाणू हे दोघे भाऊ शेती कसायचे. सामाईक शेती असल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. या वर्षी शेतामधील सोयाबीनचे पीक पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याने अलीकडे ग्यानू विवंचनेत होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे लाख रुपये व इतर सावकारी कर्जामुळे तो हतबल झाला होता. दरम्यान, काल बुधवारी दुपारी आपल्या राहत्या झोपडीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मागे दोन मुले, मुलगी व पत्नी असा आप्तपरिवार आहे.
ब्रह्मपुरी : यंदा पावसाने कहर केला. हातात आलेला घास पावसाने हिरावला. हाती काहीच नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेत एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. विश्वनाथ गुरनुले (वय 68) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 21) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
तालुका मुख्यालयापासून 24 किमी अंतरावर बरडकिन्ही हे गाव आहे. मृत विश्वनाथ गुरनुले हे आपल्या पत्नीसमवेत राहतात. त्यांना एक मुलगी होती. तिचे गावातीलच एका तरुणाशी लग्न झाले. बुधवारी विश्वनाथ गुरनुले यांनी पत्नीसोबत जेवण घेतले.
या वर्षी शेतीचा हंगाम हातून गेला. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, यावर पत्नीसोबत चर्चा केली. त्यानंतर ते घराबाहेर पानठेल्यावर बसायला जातो म्हणून निघाले. बराच वेळ होऊन ते घरी परतले नाही. त्यामुळे पत्नीला ते मुलीकडे झोपायला गेले असावे, असे वाटले. गुरुवारी सकाळी शेतकरी शेतावर जाण्यास निघाले. तेव्हाच विश्वनाथचे स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लावल्याचे दिसून आले. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.