नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवरील जनावरांमुळे नागरिक संतप्त झाले असून एखाद्याचा बळी गेल्यानंतरच महापालिका जनावर मालकांवर कारवाई करणार काय? असा सवाल उपस्थित करीत आहेत. पालिकेच्या दिरंगाईमुळे शहरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यात पावसामुळे गोठ्यातील जनावरांनी रस्त्यांवरच ठाण मांडल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. शहरात 3 हजार 960 किमीचे रस्ते आहेत. यात पालिकेच्या 2682 किमी रस्त्यांसह नासुप्रचे 1124, राष्ट्रीय महामार्ग 43.60, राज्य महामार्गाचे 7, इतर जिल्हामार्गाचे 62 तर 41 किमीच्या रिंग रोडचा समावेश आहे. यातील 90 टक्के रस्त्यांवर जनावरांचे कळप दिसून येत आहे. पावसामुळे जनावरांचा 24 तास मुक्काम रस्त्यांवरच दिसून येत आहे. वस्त्यांतील लहान रस्ते, प्रमुख सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांवर जनावरांनी उच्छाद मांडला आहे. मानेवाडा रोड, सुभाषनगर रोड, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, दिाघोरी, भांडे प्लॉट, जगनाडे चौक रोड, इंदोरा चौक, कामठी मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू, वायुसेनानगर, फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड, अग्रसेन चौक ते कमाल चौक, टिमकी, जागनाथ बुधवारी, उमरेड रोड, भंडारा रोड, छिंदवाडा रोड, अमरावती रोड, वर्धा रोडवर जनावरामुळे नागरिकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. सेंट्रल एव्हेन्यू, वर्धा रोड, हिंगणा रोड, कामठी रोडवर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. जनावरांनी रस्त्याच्या मध्यभागीच ठिय्या मांडल्याने वाहने काढावी कशी? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. रामदासपेठ, धंतोलीसारख्या पॉश वस्तीतील रस्त्यांवरही मोकाट जनावरे दिसून येत आहे. रस्त्यांवरील जनावरांना बगल देत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना नागरिकांचे अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले तर काहींनी जनावरांच्या भीतीने ये-जा करण्याचा मार्गच बदलविला. एकूणच सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि जनावरांची नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. | |