अकोला : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामध्ये आता 3 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या या स्थितीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. 23-24 दिवसांपासून ऑटोची चाकं रुतलेली असल्याने जिल्ह्यातील 12 हजारांवर ऑटो चालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउन पूर्वी घरात आणलेला किराणा संपत आल्यामुळे यानंतर घरातील चूल पेटवायची कशी, असा प्रश्न ऑटो चालकांसमोर आहे.
कोरोनाच्या समूह संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात 21 दिवसांची टोळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाला बसत आहे. त्यामध्ये हातावर पोट असलेल्या ऑटो चालकांचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन पूर्वी काही ऑटो चालकांनी त्यांच्या जवळ जमा असलेले पैसे खर्च करुन घरात किराणा व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी केले होते.
आता त्यांच्या जवळचा किराणा व इतर साहित्य संपत आहे. त्यामुळे यापुढे घरातील चूल पेटवायची कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जिल्ह्यात ऑटोच्या चाकांवर पोट असणाऱ्यांची संख्या 12 हजारांवर आहे. जेवढे ऑटोचे चाक धावेल तेवढाच पैसा या वर्गाकडे येतो. परंतु आता ऑटोची चाकं रुतलेली असल्याने जिल्ह्यातील ऑटो चालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्ड आहे रेशन नाही
जिल्ह्यात ऑटो चालकांची संख्या 12 हजारावर आहे. त्यापैकी अकोला महानगरात 7 हजार 500 आटो धावतात. ग्रामीण भागात तर ऑटोंमुळेच जनजीवन सुरळीत राहते. परंतु गत काही दिवसांपासून ऑटोची चाकं रुतलेली असल्याने ऑटो चालकांना गंभीर स्थितीतून जावे लागत आहे. शासनाने प्राधान्य, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना रेशनचे धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी शेकडो ऑटो चालकांकडे रेशन कार्डच नाहीत. काही चालकांकडे कार्ड आहेत परंतु ते बंद पडलेले असल्याने येणाऱ्या काळात घरातील चूल पेटवून पोटाची आग विझवायची कशी, असा प्रश्न ऑटो चालकांसमोर उभा आहे.
पालकमंत्र्यांकडे साकडे
वाढलेल्या लॉकडाउनमुळे ऑटो चालकांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यांच्यासोर उदरनिर्वाहासह रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच स्थिती कायम राहली तर ऑटो चालकांचे धैर्य खचेल त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे शासनाने ऑटो चालकांना शासकीय मदतीचा आधार द्यावा, अशी मागणी ऑटो चालक संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
आता शासनानेच द्यावा आधार
वाढलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील ऑटो चालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही चालकांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे संघटनेने त्यांना किराणा व इतर माल पोहचवून मदत केली. परंतु आता चालकांची स्थिती अतिशय खराब होत असल्याने शासनानेच मदतीचा हात पुढे करावा. त्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.
- संतोष शर्मा
महानगर अध्यक्ष,
अकोला जिल्हा ऑटो चालक श्रमिक कामगार संघटना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.