नागपूर - शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या अकाउंटंटच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मौदा पोलिसांना यश आले आहे. काम व्यवस्थितपणे करण्यासाठी वारंवार चिडचिड करून अपमान करीत असल्याच्या कारणाने ज्युनियर असलेल्या सहकारी अकाउंटंटनेच आपल्या साथीदारासह राजू गिरीधारीलाल नारंग (वय ५०) याचा खून केल्याचे प्राथमिक तपासांत उघडकीस आले आहे. पोलिसांनी विधिसंघर्ष बालकासह पाच जणांना अटक केली आहे. त्यांची आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
राजू ऊर्फ देवीदास नथवानी (४८, रा. लकडगंज, नागपूर), दीपेश विनोद ठक्कर (२६, रा. दिघोरीकर चौक, नागपूर), अशोक विनायकराव लोणे (४४, रा. दिघोरी चौक, उमरेड रोड नागपूर), करणसिंग ऊर्फ बहादुरसिंग अमरसिंग जायगडी (४६, रा. रामदासपेठ, नागपूर) व विधिसंघर्ष बालक (१७, रा. लकडगंज, नागपूर) अशी आहेत. नागपूर येथील हिवरीनगर परिसरातील राजू गिरधारीलाल नारंग (वय ५०) एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम पाहत होते. २७ डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास राजू नारंग अचानक बेपत्ता झाले. ते कंपनीच्या कळमना येथील कार्यालयातून रामदासपेठ येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. परंतु, नारंग हे कार्यालयात पोहोचले नसल्याने कंपनीतील सहकाऱ्यांनी नारंग यांना फोन केला; पण तो बंद असल्याचे कळले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबातील काही व्यक्ती व कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांची शोधाशोध केली, तरी त्यांचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मौदा व माथनीच्या मधोमध एका पुलाखाली पोत्यात भरलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णतः विद्रूप झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेताच, त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यामध्ये राजू नथवानी याला त्याच्या कामावरून राजू नारंग वेळोवेळी चिडचिड करीत होते. यातून राजू चिडून असल्याने त्यावर पोलिसांची संशयाची सुई गेली. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या कामात त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली.
मोबाईलवरून लोकेशन
अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने राजू नथवानी याने आपल्या मित्रांसह राजू नथवानी याने नारंग यांचे अपहरण केले. यावेळी भंडारा मार्गावर शहराच्या बाहेर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह एका पोत्यात भरला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पोत्यात भरलेला मृतदेह पुलाखाली फेकला. नारंग यांच्याजवळ दोन मोबाईल होते. घटनेनंतर पोलिसांना दोन्ही मोबाईलवर वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळाली. २७ डिसेंबरला नारंग बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर मोबाईलवर तपासले. मोबाईल क्रमांक नारंग यांच्या परिसरातील डिप्टी सिग्नल एरियातील असल्याचे आढळले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.