कोंढा (जि. भंडारा) : गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद मांडलेल्या कोरोनामुळे अनेकांची ताटातूट झाली. लॉकडाऊनमध्ये पतीला पत्नीपासून तर मायेला लेकरापासून दूर राहावे लागले. नवीन लग्न झालेल्या नवपरिणीत जोडप्यांना विरह सहन करावा लागतोय. असाच एकच प्रसंग कोंढा नजीकच्या पालोरा (ता. पवनी) येथे घडला. वधू चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने लग्न करून गावी आलेल्या वराने स्वत: नव्या नवरीसह क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.
आतापर्यंत फक्त मोठ्या महानगरांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाने घरवापसी करणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून गावांतही शिरकाव केला. त्यामुळे आतापर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण नागरिकांत धडकी भरली. कोण, कुठून कसा येईल अन आपल्यासोबत कोरोना घेऊन येईल, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव व वाढता प्रसार लक्षात घेता, त्यांची ही भीती व काळजी रास्त आहे.
ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 28 झाली. भंडारा शहरातील चार रुग्ण वगळता इतर सारे रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत निरकं असलेल्या पवनी तालुक्यातील रुग्णांची संख्या तीन झाली. हे सर्व रुग्ण संस्थात्मक विलगीकरणातील आहेत. अड्याळ गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित झाले. त्यामुळे पवनी तालुक्यातही ग्रामीण भागात कमालीची दहशत आहे.
पालोरा येथील तरुणाचे लग्न शुक्रवारी (ता. 29) चंद्रपूर जिल्ह्यातील वाकल (ता. सिंदेवाही) येथील तरुणीशी मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत एका मंदिरात सामाजिक अंतर पाळून पार पडले. घरी नवी नवरी येणार म्हणून वराकडील मंडळी तिच्या स्वागताची तयारी करून आगमनाची वाट पाहत होते. परंतु, वधू चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्यामुळे कोणीही अडचणीत येऊ नये. त्यासाठी रितसर संस्थात्मक विलगीकरणात राहण्याचा निर्णय नवरदेवाने घेतला. सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत करीत दोघांची रवानगी गावातील खासगी शाळेतील विलगीकरण केंद्रात केली.
अतिउत्साही व सामाजिक भान न जोपासणाऱ्या लोकांच्या चुकीचा परिणाम इतरांना भोगावा लागतो. शहरातील शहाणे व शिकलेले लोकसुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वत: विलगीकरणात राहण्यास मागेपुढे पाहतात. माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, दूध संकलनाचे काम करीत असल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, यासाठी या शेतकरी कुटुंबातील नवविवाहित जोडप्याने स्वत: दुरावा व विरह सोसून विलग राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे गावात कौतुक होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.