यवतमाळ : संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेले निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी (ता.15) धडकले. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे महसूल प्रशासनात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या मार्च महिन्यात कोविड संसर्ग आल्यापासून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी प्रशासकीय जबाबदारी निष्ठेने पार पाडली. या काळात त्यांच्या संवेदनशील मनाचा परिचय अनेकांना आला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कोविड-19च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर 2020-2021 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात सूचना निर्गमित आलेल्या आहेत.
त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005मधील तरतुदीनुसार उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. आरडीसी वऱ्हाडे यांच्या जागेवर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील नितीनकुमार हिंगोले यांना पदस्थापना देण्यात आली तर, वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांना समकक्ष पदावर दारव्हा येथे पदस्थापना देण्यात आली. आरडीसी वऱ्हाडे यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येणार आहे.
मॅटमध्ये जाण्याची शक्यता
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचा यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे. त्यांच्या बदलीची कुठेही चर्चा नव्हती. शिवाय त्यांच्या कार्यशैलीबाबत कुणीही सामान्य नागरिकाने तक्रार केली नाही. तरीदेखील महसूल व वनविभागाने बदलीचे आदेश काढले. वऱ्हाडे यांची बदली अन्यायकारक आहे. त्यामुळे ते दाद मागण्यासाठी मॅटमध्ये जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नितीनकुमार हिंगोले यांनी घेतला पदभार
यवतमाळ : येथील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) ललितकुमार वऱ्हाडे यांची बदली झाली आहे. त्यामुळे आता नितीनकुमार हिंगोले हे यवतमाळचे नवीन आरडीसी राहतील. श्री. हिंगोले यांनी बुधवारी (ता.16) जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी या पदाचा पदभार सांभाळला.
"इगो' दुखावल्याचे निमित्त
मध्यंतरी वऱ्हाडे यांच्यासोबत महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे खटके उडाले होते. हा वाद बराच काळ चर्चेत राहिला. त्यामुळे वऱ्हाडे काही दिवस वरिष्ठांच्या कक्षातही गेले नव्हते. दोघांत समेट घडून आल्याची चर्चा महसूल प्रशासनात होती. मात्र, "इगो' दुखावल्याची आग आतमध्ये धुमसत होती. मधल्या काळात अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. त्या निवेदनावर आरडीसी वऱ्हाडे यांचीही स्वाक्षरी होती. राजकीय वजन वापरून आरडींसीची बदली करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.