मंदीने हिरावल्या रोजगाराच्या संधी! 

मंदीने हिरावल्या रोजगाराच्या संधी! 

मुंबई:  देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असून विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये मंदीचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. सेवा क्षेत्र वगळता इतर बहुतांश क्षेत्रांमध्ये गेल्या वर्षभरात नोकरभरती ठप्प असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. 

दीर्घकाळापासून मंदीने ग्रासलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रापाठोपाठ बिगर बॅंकिंग वित्त संस्था (एनबीएफसी), वाहन निर्मिती, निर्यात, लघु आणि मध्यम उद्योगांमधील मंदीने नव्या रोजगाराच्या संधी हिरावल्याचे भीषण चित्र समोर आले. "केअर रेटिंग्ज' या संस्थेने एक हजार कंपन्यांचा नोकर भरतीविषयीचा कल जाणून घेतला. ज्यात बॅंका, विमा, वाहन निर्मिती आणि वितरण, दळणवळण आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी वर्षभरापासून नव्या नोकरभरतीचा वेग कमी केला आहे. सेवा क्षेत्रात मात्र नोकरभरती समाधानकारक असल्याचे केअर रेटिंग्जने म्हटले आहे. मागणीतील घट, विकास दराच्या पाच वर्षांतील नीचांकाने अर्थव्यवस्थेत मंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 

"केअर रेटिंग्ज'च्या आकडेवारीनुसार मार्च 2018 अखेर 57 लाख 80 हजारांपर्यंत रोजगार संधी वाढल्या. ज्यात केवळ 6.2 टक्के वाढ झाली. मार्च 2017 मध्ये 54 लाख 40 हजार रोजगार उपलब्ध होते. मार्च 2019 अखेर 60 लाख तीन हजार रोजगार असल्याचे "केअर रेटिंग्ज'च्या अहवालात म्हटले आहे. रोजगार निर्मितीत केवळ 4.3 टक्के वाढ झाली. 

आदरातिथ्य क्षेत्राने सावरले 
हॉटेल उद्योगात (हॉस्पिटॅलिटी) नोकरभरती कायम आहे. "हॉस्पिटॅलिटी'मधील कंपन्यांकडून कुशल मनुष्यबळाला चांगली मागणी असल्याचे केअर रेटिंग्जने म्हटले आहे. लोह खनिज, पोलाद क्षेत्रातील रोजगारांमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. बुडीत कर्जे, दिवाळखोरी आणि नादारी प्रकरणांमुळे बॅंकांची अवस्था बिकट झाली असून बॅंकिंग सेवेत रोजगारांना ग्रहण लागले आहे. भांडवल प्रमाण राखण्यात दमछाक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी नोकरभरतीला पूर्णविराम दिला आहे. 

बेरोजगारीचा विस्फोट होणार 
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) आकडेवारीनुसार 2017-18 या वर्षात देशातील बेरोजगारीचे प्रमाण 6.1 टक्‍क्‍यांवर वाढले होते. गेल्या 45 वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांक होता. जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत बेरोजगारीचा आढावा घेण्यात आला होता. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे "एनएसएसओ'च्या अहवालात म्हटले होते. गेल्या वर्षभरात औद्योगिक क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे रोजगारनिर्मिती ठप्प आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारीचा विस्फोट होण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com