नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन जेटली यांनी अर्थसंकल्पात केले.
यंदा पारंपरिक प्रथांना छेद देत केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प रद्द करीत केंद्रीय अर्थसंकल्प तब्बल एक महिना अगोदर सादर करण्याचा निर्णय घेतल्याने हा अर्थसंकल्प अधिक लक्षवेधी ठरला आहे. रेल्वेसाठी १.३१ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प जेटली यांनी मांडला.
वसंत पंचमीच्या मुहुर्तावर सादर केला जाणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण लोकसंख्या, युवक, गरीब, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षेत्र, कालबद्ध उत्तरदायित्व, सार्वजनिक सेवा, खर्चावर नियंत्रण आणि सुटसुटीत करणप्रणाली या दहा मुद्द्यांवर सरकारचा भर असेल, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांच्या निधनामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे ही विरोधकांची मागणी नाकारत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अर्थसंकल्प आजच सादर करण्याची घोषणा केली. अर्थसंकल्प पुढे ढकलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन
'अ राइट कॉज नेव्हर फेल्स' या गांधींच्या सुविचाराची आठवण करुन देत नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. दहशतवादी कृत्ये व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादन(जीडीपी) आणि कर संकलनात वाढ होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. काळा पैशाविरोधातील लढाईतील महत्त्वाचा टप्पा असणारा निर्णय स्विकारल्याबद्दल देशातील सर्व नागरिकांचे आभार मानत नागरिक सरकारकडे 'विश्वसनीय रक्षक' म्हणून पाहत असल्याचे जेटली म्हणाले.
विकसनशील देशांच्या तुलनेत भारत आघाडीवर
जगभरातील विकसनशील देशांसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मंदावलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असून थेट परदेशी गुंतवणूकीत वाढ झाल्याचे जेटलींनी नमूद केले. त्याचप्रमाणे, देशातील प्रत्येक घटकापर्यंत विकास योजनांचा लाभ पोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.
प्राप्तिकराचे दायित्व कमी करीत सामान्य नागरिकांना खुश केले. अडीच ते पाच लाखांदरम्यान उत्पन्न मिळविणाऱ्या नागरिकांना आता 10 टक्क्यांऐवजी केवळ 5 टक्के प्राप्तिकर भरावा लागणार, असे जेटली यांनी घोषित केले.
अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये :
अरूण जेटली उवाच :
राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) अधिक विशाल, स्वच्छ आणि मजबूत बनविण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांपैकी नोटाबंदी हा एक निर्णय होता. नोटाबंदीबरोबरच वस्तु व सेवा कराचा (जीएसटी) भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव जाणवेल. करचुकवेगिरी हा देशातील अनेक जणांच्या आयुष्याचाच भाग बनला होता. मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारताचा प्रवास हा सक्षम अर्थव्यवस्थेकडे सुरु झाला आहे. आता लोकनिधीचे "विश्वासार्ह विश्वस्त' म्हणून सरकारकडे पाहिले जात आहे. नोटाबंदीमुळे जीडीपी व करसंकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या या निर्णयाचे नकारात्मक परिणाम पुढील वर्षात जाणविणार नाहीत. नवीन नोटा चलनात आणण्याच्या काळात (रिमॉनेटायझेशन) अर्थव्यवस्था मंदाविल्यास तो तात्पुरता परिणाम असेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.