नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 95 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारकडून संसदेत मंगळवारी (ता.19) ही माहिती देण्यात आली.
राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 5 हजार 743 गैरव्यवहारांची प्रकरणे समोर आली असून त्यांची एकूण रक्कम 95 हजार 760 कोटी रुपये आहे. बँकामधील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी पावले उचलण्यात येत आहेत.
याआधी पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांनी केलेला गैरव्यवहार आणि विजय मल्ल्या याने बुडविलेले कर्ज ही प्रकरणे बराच काळ चर्चेत होती.
त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार असून, 78 टक्के ठेवीदार बँकेतील त्यांच्या बचत खात्यातील सर्व रक्कम काढू शकणार आहेत. पीएमसी बँकेतील एकूण 9 लाख 15 हजार 775 ठेवीदार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.