पुरेसे 'इन्श्युरन्स कव्हर' घेतले आहे का?

पुरेसे 'इन्श्युरन्स कव्हर' घेतले आहे का?

अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच आयुर्विमा ही एक मूलभूत गरज बनली आहे, हे आता सर्वमान्य झाल्यामुळे आयुर्विम्याचे महत्व पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही.

परंतु, एखादा विमा सल्लागार जेव्हा एखाद्या संभाव्य ग्राहकाकडे विमा योजनांची माहिती देण्यासाठी जातो, त्यावेळी त्याला बरेचदा 'माझा तब्बल पाच लाखांचा विमा आहे. पुरे झाला आता विमा' असे उद्गार ऐकायला मिळतात. आता हा 'तब्बल' पाच लाखाचा विमा खरंच पुरेसा आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आयुर्विमा ही गुंतवणूक नव्हे तर ते विमेदाराच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करणारे संरक्षक कवच आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर विमेदाराच्या आकस्मिक मृत्युमुळे कुटुंबाचे जे आर्थिक नुकसान होते त्याची भरपाई देण्यासाठीची व्यवस्था म्हणजे आयुर्विमा. हे एकदा मान्य केले की केवळ पाच ते सात लाखांचा विमा घेतला तर तो पुरेसा होणार नाही हेही सहज पटेल. मग 'पुरेसा' म्हणजे किती विमा घ्यावा लागेल याचे उत्तर आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आर्थिक मूल्याइतका विमा घेणे आवश्यक आहे.

आता एखाद्या व्यक्तीचे आर्थिक मूल्य हे त्याच्या उत्पन्नाशी निगडित असणार हे उघड आहे. त्यानुसार व्यक्तीचे आर्थिक मूल्य (ज्याला विम्याच्या परिभाषेत 'ह्यूमन लाईफ व्हॅल्यू'  म्हणतात.) ठरविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याप्रमाणे 'ह्यूमन लाईफ व्हॅल्यू'  ठरविताना विमेदाराचे वय, वार्षिक उत्पन्न, निवृत्तीचे वय, सध्याची मालमत्ता, कर्ज-देणी, आर्थिक जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. या थोड्याशा क्लिष्ट तांत्रिक बाबीत न शिरता सोपे सूत्र वापरायचे झाले तर असे सांगता येईल की एखाद्या व्यक्तीने स्थूलमानाने त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट इतक्या रकमेचा आयुर्विमा घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आर्थिक मूल्याला संरक्षण मिळू शकेल.

समजा, वार्षिक उत्पन्न आठ लाख असणाऱ्या व्यक्तीने 12 पट रकमेचा म्हणजे एक कोटी रकमेचा विमा घेतला आहे. आता या विमेदाराचे आकस्मिक निधन झाले तर कुटुंबाला एक कोटी रकमेचा 'क्लेम' मिळेल. ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतविली आणि आठ टक्के दराने परतावा मिळाला तर त्या कुटुंबाला दरवर्षी आठ लाख रुपये मिळत राहतील आणि निर्माण झालेली आर्थिक पोकळी बव्हंशी भरून यायला मदत होईल. आता इथे जर पाच लाखाच्या विमा रकमेवर त्याने समाधान मानले असते तर ती रक्कम कुटुंबाला पुरेसे आर्थिक स्थैर्य देऊ शकली असती का? निश्चितच नाही.

तेव्हा केवळ आपल्याकडे आयुर्विमा पॉलिसी आहे म्हणून संतुष्ट न राहता आपले विमा संरक्षण पुरेसे आहे का? ते एकदा तपासून बघा आणि नसेल तर नवीन पॉलिसी घेऊन ते अधिक बळकट करा. त्यादृष्टीने अत्यल्प 'प्रीमियम'मध्ये भरघोस संरक्षण देणारी 'टर्म इन्शुरन्स' ही पॉलिसी आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल.

लेखक निवृत्त विमा अधिकारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com